तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते. 



प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत असतो. मुळात त्यात चूक असे काहीच नाही. पण त्या विचारांना त्या तत्वांना आपल्या विचारांनी पाहण्याची आपली स्वतः ची बाजू मांडण्याची ताकत ज्या व्यक्तीत असते तो खरा तत्वनिष्ठ असतो असे मला वाटते. यामध्ये सखोल विचार करून पाहिले तर असे जाणवून येते की एखाद्या व्यक्तीच्या तत्वांना पाहताना आपण आपले अस्तित्व विसरता कामा नये याला म्हणावे आपल्या विचारां सोबत जगणे.



मुळात यामध्ये मांडण्याचा प्रयत्न हा आहे की आपल्या आयुष्यात नक्कीच आपल्याला कोणी ना कोणी व्यक्ती, गुरु अथवा मार्गदर्शक आवश्य आहे. तो नकळत आपल्याला भेटतो ही. आणि ते हवेच असते. कारण योग्य मार्ग दाखवणार जीवनात हवाच. पण यावेळी आपण स्वत्वाला विसरून फक्त त्याच्याच विचारांवर चालणे याला आंधळे विचार असे म्हणता येईल. कारण आपण ज्यावेळी आपण वाचन करतो त्यावेळी अनेक प्रसिद्ध लेखकांचे विचार , त्यांचे नियम , त्यांची तत्व वाचतो. त्यांच नकळत अनुकरण ही करतो. पण त्यातून प्रेरणा घेऊन आपले स्वत्व जो जपतो. आपले प्रखर विचार निर्भिड मांडतो. तोच पुढे नेतृत्वाची क्षमता ठेवतो अस मला वयक्तिक वाटत. असो पण यामध्ये आपल्या विचारात जर काहीच वेगळं मत येत असेल तर त्याला हसून जो स्वीकारतो जर ते योग्य असेल तर त्यात बदल करतो तो पुढे आपल्या विचारांची पेरणी नव तरुणाईत करतो हेही तितकेच खरे आहे. 


माणूस शेवटी शिकतो ते आपल्या अनुभवातून आणि त्याला योग्य मार्ग दाखवणारे त्याच्या तत्वांना फुंकर घालणारे योग्य वेळी योग्य ठिकाणी त्याला चूक दाखवणारे खरे व्यक्ती आपल्या सोबत असावे ही खरी मोठी बाब आहे. कारण स्वामी विवेकानंद हेही रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. पण पुढे त्यांनी आपल्या विचारांनी आपल्यातील स्वस्त्व जागृत करून नव्या तत्वांची नव्या विचारांची पेरणी केली. म्हणजे काय तर माणसाने व्यक्तिनिष्ठ असावे पण अश्या व्यक्तीस की त्यांच्या सोबतीने माणूस तत्वनिष्ठ होईल. खरतर यामध्ये आपण खूप गुरु शिष्यांची उदाहरणे घेऊ शकतो जिथे गुरूने आपल्या शिष्यास त्यांच्या स्वत्वाची जाणीव करून दिली आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना तत्वनिष्ठ बनवले. आणि तेही पुढे येणाऱ्या व्यक्तिनिष्ठ लोकांना मार्ग सांगणारे त्यांच्यातील तत्वांना जागृत करणारे बनले. 



विचारांचा डोंगर ज्यावेळी उभा राहिला तेव्हा मला एक गोष्ट नक्की जाणवली. की जेव्हा मी या विचारांचा डोंगर रचत होतो तेव्हा तत्व आणि व्यक्ती दोघेही सोबतच वर चढत होते. यामध्ये कोणीच कुठे थांबले नाही. जिंकले ते दोघेही , कारण विचारांशी झुंजत असताना असे जाणवले की व्यक्ती हा कुठे ना कुठे व्यक्तिनिष्ठ असतोच आणि तो जिथे आपल्या तत्वाने चालतो तिथे तो तत्वनिष्ठ होतो फक्त गल्लत  ती अशी होऊ नये की व्यक्तिनिष्ठ होताना आपल्या तत्त्वाना विसरू नये आणि आपल्या तत्वांनी चालताना व्यक्तिनिष्ठ गुरुजनांचा आदर , त्यांचे विचार कधी विसरू नये. हेच खरे मार्ग आपल्याला आपले स्वत्व मिळण्याचे प्रमाण. 


✍🏼 योगेश खजानदार

रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||


रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !!
क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !!
दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !!
पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !!

चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !!
चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !!
गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !!
कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !!

स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !!
सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !!
धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !!
सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !!

शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !!
झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !!
कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !!
कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !!

कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !!
कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !!
कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !!
कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !!

©योगेश खजानदार

•ALL RIGHTS RESERVED•

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||


कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !!
चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !!
बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !!
बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !!

घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !!
बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !!
धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !!
तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !!

होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !!
कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !!
गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !!
माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !!

बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !!
प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !!
अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !!
अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !!

काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !!
कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !!
होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !!
दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !!

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !!
चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !!

©योगेश खजानदार

•ALL RIGHTS RESERVED•

न भेटले मज कोणी || एकांत मराठी कविता || Marathi Ekant kavita ||



न भेटले मज कोणी, न भेटलो मी कोणा !!
न बोलले मज कोणी, न बोललो मी कोणा !!
बंदिस्त घर हे दिसे, बंदिस्त मी या घरा !!
न मला कोण आठवे, न आठवलो मी कोणा !!

न नाते कोणी जपले, न जपले मी कोणा !!
न कोणी वाट पाहे, न पाहिले मी कोणा !!
अबोल घर हे दिसे, अबोल मी या घरा !!
न मला गृहीत धरले, न धरले मी कोणा !!

न प्रेम कोणी केले, न झाले मज कोणा !!
न लिहिले पत्र कोणी, न लिहिले मी कोणा !!
रिक्त घर हे दिसे, रिक्त मी या घरा !!
न मला कळले ते, न कळलो मी कोणा !!

न हाक कोणी दिली, न दिली मी कोणा !!
न कोणी हरवुन गेले, न हरवलो मी कोणा !!
उनाड घर हे दिसे, उनाड मी या घरा !!
न मला दिसले ते, न दिसलो मी कोणा !!

न साथ कोणी दिली , न दिली मी कोणा !!
न जगले कोण मजसाठी, न जगलो मी कोणा !!
एकटे घर हे दिसे, एकटा मी या घरा !!
न मला सापडे ते, न सापडलो मी कोणा !!

© योगेश खजानदार

•ALL RIGHTS RESERVED•

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||



भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !!
तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ??
नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !!
तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !!

स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !!
गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ??
क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !!
कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !!

निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे !
रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !!
रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !!
सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !!

वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !!
विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ??
क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !!
तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !!

व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !!
मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !!
अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !!
अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !!

©योगेश खजानदार

•ALL RIGHTS RESERVED•

पौर्णिमेचा चंद्र || कोजागिरी पौर्णिमा कविता || मराठी कविता || Poems ||



शुभ्र वस्त्र नेसूनी, चांदण्यात मग हरवूनी !!
रात्रीस त्या बोलता,  हळुच तो हसला !!

लपंडाव तो खेळूनी, ढगांसवे त्या धावुनी !!
पौर्णिमेचा चंद्र तो, दुधामध्ये त्या दिसला !!

वारा बेधुंद वाहुनी, क्षणास क्षणभर थांबुनी!!
नजरेत त्या साठवता, मनात तो उरला !!

गारवा तो स्पर्शूनी, शब्दाविना जणू बोलूनी !!
गोडवा त्या ओठांवरी, आज तो राहिला !!

सोबतीस सारे येऊनी, सोबत त्यास देऊनी !!
सुर असे छेडता, चंद्र गाऊ लागला !!

रात्र पुढे जाऊनी, जागेच त्यासवे राहुनी !!
आपुल्यांस त्या क्षणी, प्रेम देऊ लागला !!

गंध सारे पसरूनी, दाही दिशा व्यापूनी !!
पौर्णिमेचा चंद्र तो, लख्ख प्रकाशत राहिला !!

© योगेश खजानदार

•ALL RIGHTS RESERVED•

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||


वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !!
धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !!
माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !!
सखे एक मी, एक तू उरावी !!

गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !!
पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !!
सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !!
ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !!

गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !!
माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !!
सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !!
सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !!

चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !!
नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !!
मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !!
मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !!

श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !!
तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !!
कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !!
तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !!

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !!
धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !!

©️योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...