मनातलं...

तुझ्या जवळ राहुन मला
तुझ्याशी खुप बोलायच होतं
तुझ्या डोळ्यात पाहुन तेव्हा
माझ्या मनातल सांगायच होतं

कधी नुसतच शांत बसुन
तुला पापण्यात साठवायच होतं
तर कधी उगाच बोलताना
तुला मनसोक्त हसवायच होतं

त्या नेहमीच्या वाटेवर
तुला रोज भेटायच होतं
नकळत तरी तेव्हा मला
तुझ्या मनात रहायचं होतं

चिंब पावसात भिजलेलं
तुझ ते हसु पहायचं होतं
गार वार्‍या सोबत झुलताना
कधी स्वतःला हरवुन जायचं होतं

वहितल्या शब्दांना पुन्हा
ओठांवर आणायचं होतं
आणि तुझ्या डोळ्यात पाहून तेव्हा
माझ्या मनातल सांगायचं होतं..!!
-योगेश खजानदार

मैत्रीण. .. !!!

निखळ मैत्री तुझी नी माझी
खुप काही तु सांगतेस
तुझ्या मनातल्या भावना
अलगत का तु बोलतेस

कधी असतेस तु उदास
तर कधी मनसोक्त हसतेस
माझ्या या मैत्रीची
एक गोडी तु सांगतेस

रागावतेस कधी हक्काने
वाट तु दाखवतेस
समजावतेस कधी मनातुन
आपलंस कधी करतेस

कधी मिळुन धमाल नुसती
क्षणांना साठवुन तु घेतेस
कधी होतो अबोला ही जेव्हा
चटकन सार विसरुन ही जातेस

मैत्रीण एक छान तु माझी
मला तु समजुन ही घेतेस
कधी विसरलो चुकुन तरी
आठवणही तु करुन देतेस

मैत्री म्हणजे नक्की काय असते
हे तु मला सांगतेस
मैत्रीण म्हणुन तु ही तेव्हा
साथ मला नेहमी देतेस ... !!!
-योगेश खजानदार






मन

काहीतरी राहून जावं
अस मन का असतं
झाडावरची पाने गळताना
उगाच ते पहात असतं

हे मिळावं ते रहावं
स्वतःस का सांगत असतं
काही तरी गमावल्यावर
लपुन का ते रडतं असतं

मी आहे माझ हे सर्व
माझ माझ का करत असतं
कुठेतरी सर्व हरवल्यावर
दोष का ते देतं असतं

सांग तरी काय चुकलं
कोणास ते विचारत असतं
उत्तर इथे नाही मिळताच
एकांतात का ते राहतं असतं

मन हे मनच अखेर
स्वतःचा तळ शोधत असतं
कुठेतरी रस्ता चुकल्यावर
वाट का ते शोधत असतं..
-योगेश खजानदार

प्रवास. .. !!!

"वाटा पडतात मागे
वळणे ही नवीन येतात
कधी सोबती कोणी
कधी एकांतात रहातात

अंधारल्या वेळी ही कधी
चंद्र तारे सोबत असतात
कधी सुर्यास्त येता जवळी
पक्षी घरट्या कडे जातात

हा प्रवास माझा असा
कधी नवीन सहप्रवासी असतात
कधी जुन्या वळणावरती
आपुले कोणी भेटतात

थांबता क्षणभर कोठे
हे मन का बोलु लागतात
सुकलेली पाने गळुनी
नवी पालवी फुटु लागतात

चालतच राहावे आता
हे प्रवास न आता थांबतात
कधी सुटते साध आपल्याशी
कधी अनोळखी हात धरतात

वाटा पडतात मागे
वळणे ही नवीन येतात... !!"
-योगेश खजानदार

तुला लिहिताना. . !!

पानांवर तुला लिहिताना
कित्येक वेळा तुझी आठवण येते
कधी ओठांवर ते हसु असतं
आणि मनामध्ये तुझे चित्र येते

कधी शब्दात शोधताना
पुन्हा उगाच तुझ्याकडे येते
भावना ती तुझीच असते
कविता होऊन माझ्याकडे येते

वहित लिहिलेले शब्द जेव्हा
पानांवर ती कोरत येते
चुरगळलेल्या पानांवरती
कित्येक शब्द सोडुन येते

वाचताना ओळ ती मनातील
ह्रदयास ती सांगत येते
लिहिलेल्या प्रत्येक शब्दांशी
नातं ती जोडत येते

मनातलंच ते सगळ माझ्या
ओठांवर का कधी येते
आणि पानांवर तुला लिहिताना
कित्येक वेळा तुझी आठवण येते
-योगेश खजानदार
















जागतिक महिला दिन. .

एक आई म्हणुन , प्रेयसी म्हणुन किंवा इतर कोणत्याही रुपात स्त्री ही फक्त आपलं प्रेमच देत असते. अशी अनेक रुपे ही स्त्री करतं असताना तिच्यातील तो भाव सहज दिसुन येतो. कदाचित प्रेम या संकल्पनेचा दुसरा शब्दच स्त्री असेन. आईच प्रेम, बायकोच प्रेम, बहिणीच प्रेम अशा कित्येक रुपात ती रहात असते. प्रेमाची ही मुर्ती खरंच खुप छान असते.
  कधी ही हसते. कधी ही रडते ही. मनातलं कधी सांगते तर कधी लपवते ही. स्त्री ही सहनशक्तीच प्रतिक ही आहे आणि रागाच ही. प्रेम ही असतं राग ही असतो. स्पष्ट ती कधी सांगते तर कधी ओळखुन घ्यावं लागतं. तर कधी स्वतःहुन बोलावं लागतं. अशा कित्येक मनाच्या , स्वभावाच्या छटा पहायला मिळतात.
  समाज, रुढी, परंपरा यांच्या जाचातून आजपर्यंत फक्त स्त्रीच भरडली गेली. ऐवढं असुनही आजही ती पुरुषांच्या बरोबरीने चालते. आजही स्त्री कोणत्याच बाबतीत पुरुषांनपेक्षा कमी नाही. जसं एक पुरुष कुटुंबाची गरज भागवु शकतो तशी आज एक स्त्री ही भागवु शकते. आणि सुशिक्षित समाजाचा आरसाच तो असतो एक सक्षम स्त्री.
स्त्री ही फक्त सुखवस्तू किंवा घरातल काम करणारी एवढाच विचार करणार्‍या समाजात कधीच प्रगती होऊ शकतं नाही हेही तितकेच खरे. अशा समाजात स्त्री बद्दल एक वेगळीच वागणूक असते. आणि आजही आपल्या समाजात अशा विचारांचे लोक रहातात हे दुर्दैव.
  पण जेव्हा स्त्री सक्षम झाली शिकली तेव्हा नक्कीच समाज प्रगती करु लागला. आज कोणत्याच बाबतीत स्री कुठेच कमी नाही वकील, डॉक्टर,  इंजीनियर  अशा सगळ्याच विभागात ती आज प्रथम स्थानावर आहे. आणि आम्हाला अशा महिलांचा सार्थ अभिमान आहे.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने. ...
 

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...