कधी तरी || एकांत मराठी कविता ||


"थोड तरी हवं या मनाला
उगाच हरवून जाणं !!
कधी जुन्या अडगळीत
उगाच रमून जाणं !!

धुळीत पडलेल्या त्या फोटोला
अलगद पुसून घेणं!!
थोड तरी हवं त्या क्षणाना
पुन्हा मागे घेऊन जाणं!!

जीर्ण झालेल्या त्या पत्रात
पुसटस आपलं नाव शोधणं!!
थोड तरी त्या शब्दातले तेव्हा
भाव डोळ्यात या दिसणं!!

तुटलेल्या त्या खेळण्यात
बालपण आपलं पाहणं!!
थोड तरी हवं या वयाला
पुन्हा लहान होऊन जाण!!

पाहता पाहता आठवणींचे
कित्येक गाव फिरून येणं!!
थोड तरी हवं पण तेव्हा
उगाच रस्ता ते विसरण!!

कधी कळत, कधी नकळत
सारं काही मनातलं सांगणं!!
थोड तरी हवं या अडगळीत
उगाच स्वतःला शोधणं..!!

थोड तरी हवं या मनाला
उगाच हरवून जाणं ..!!"

✍️©योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

आशिर्वाद द्यावा, तू आज गजानना || Ganpati Bappa Moraya ||


आशिर्वाद द्यावा , तू आज गजानना!!
परतीच्या वाटेवरी, क्षण हा रेंगाळला!!

तुझे चित्र राहो , मनी या माझ्या सदा!!
विरह हा तो आज , वाटे न यावा पुन्हा !!

विघ्नहर्ता तू , तूच आहेस लंबोदरा!!
तुझे जाणे असे की , पाह तू वळूनी जरा!!

चूकभूल न उरावी , हेच मागणे नंदना!!
गोडी त्या मोदकाची , रेंगाळुदे आता सदा !!

राग ,द्वेष, मत्सर, घेऊन जा तू तुझ्यासवे जरा !!
सुख, समृद्धी आणि आरोग्य , नांदू दे इथे सदा !!

ऐक तू माझे, लंबकर्णा , पितांबरा!!
एकदंत तू , धूम्रवर्ण तू , तुझ्याविना न कोण विश्र्वमुखा  !!

परतुनी पुन्हा येण्या , वचन दे तू मला!!
डोळ्यात आहे पाणी , आठवणीत आहेस तू सदा !!

आशिर्वाद द्यावा, तू आज गजानना !!

✍️ ©योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

प्रेम रंग || मनातल्या कविता मराठी ||


"तुझ्या मिठीत मी हरवून गेले
तुलाच न ते कधी का कळले?
डोळ्यातूनी कित्येक बोलले
परी मनातले मनात विरले

कधी नकळत सांगून गेले
सांगूनही तुला न उमगले
उमगले तरी ओठांवर अडले
तुझ्या हसण्यात सारे ते दडले

तुझ्या हातात हात मी दिले
सोबतीस या मला तू पाहिले
तुझ्या वाटेवरती चालत आले
एक तू एक मी बाकी न राहिले

तुझ्यासाठी कित्येक क्षण दिले
परी एक एक क्षण मज ते बोलले
साठवून ठेवु तरी का बरसले?
आठवात त्या तुझ्यासवे भिजले

चांदण्यात तुला कित्येक शोधले
कधी तू कधी ते भास ते झाले
चंद्रास त्या सारे मी सांगितले
का की उगाच मग ते हसले

गंध ते सारे जणू सर्वत्र पसरले
तुझे नि माझे जणू प्रेम आज फुलले
त्या पाकळ्यांत जणू मी बहरले
जेव्हा तुझ्या मिठीत मी हरवून गेले !!"

✍️योगेश खजानदार

**ALL RIGHTS RESERVED*

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...