रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||


रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !!
क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !!
दूर दूर त्या वाटेवरती, खळखळून ती हसली !!
पाना फुला फांदीवरती,हरवून जणू ती गेली !!

चंद्रासवे लपंडाव तो, पुढे पुढे चालली !!
चांदण्यासवे बोलता ती, गीत गाऊ लागली !!
गार वारा वाहता बेधुंद, गारठू ती लागली !!
कुठे शेकोटी दिसता मग, उब घेत राहिली !!

स्वप्नांच्या त्या जगात मग, हळूच ती पोहचली !!
सुर्यासवे तेव्हा ती नकळत, रात्र जणू भेटली !!
धावून धावून थकली अन् , कुठेतरी अडखळली !!
सत्याच्या त्या अंधारात, पुन्हा येऊन रुसली !!

शांत राहुन जणू मग,  खूप ती बोलली !!
झोपलेल्या त्या अंधारात, कोणीच ना ऐकली !!
कवेत घेऊन आपल्या, निपचित ती पडली !!
कित्येक गुपित जाणून ती, तरीही नाही दिसली !!

कुठे प्रणयाच्या स्पर्शामध्ये, हळूच मग ती लाजली !!
कुठे वाट पाहण्या नजरेत, अश्रू मध्ये त्या दिसली !!
कुठे मुक्त फिरत्या अनोळखी, नात्यामध्ये फुलली !!
कुठे मायेच्या कुशीत ती, निश्चित होऊन झोपली !!

©योगेश खजानदार

•ALL RIGHTS RESERVED•

मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||


कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !!
चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !!
बघतील नजरा हसतील लोक, हताश न व्हावे !!
बोलण्यापेक्षा कर्तुत्वाने मग तु, सिद्ध ते करावे !!

घेऊन हाती मशाल एक, मार्ग ते उजळावे !!
बसून मिळे सारे काही, मनातून तू काढावे !!
धरेल तुझा हात कोणी, भ्रमात न राहावे !!
तुझेच तुला जायचे पुढे, हे लक्षात ठेवावे !!

होतील शत्रू येतील पुढे, त्यांना हरवून चालावे !!
कोणी आपले जातील दूर, त्यास समजावुन सांगावे !!
गर्दीतून त्या होशील एकटा, तू तयार राहावे !!
माणसातील तू एक जिद्दी, स्वतःस तू शोधावे !!

बदलून जाईल सारे काही, न तू बदलावे !!
प्रत्येक पाऊल पडता पुढे, मागे तू पाहावे !!
अपयशाच्या वहीत मग तू, सारे काही लिहावे !!
अनुभवाच्या शाळेतून मग या, खूप तू शिकावे !!

काही सुटेल काही मिळेल, दुःख न मानावे !!
कष्ट आणि जिद्दी पुढे, नशिबाला तु झुकवावे !!
होतील सोहळे आनंदाचे ते, मनसोक्त तू नाचावे !!
दुःखावर त्या मात करून , पुढे तु निघावे !!

कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !!
चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !!

©योगेश खजानदार

•ALL RIGHTS RESERVED•

न भेटले मज कोणी || एकांत मराठी कविता || Marathi Ekant kavita ||



न भेटले मज कोणी, न भेटलो मी कोणा !!
न बोलले मज कोणी, न बोललो मी कोणा !!
बंदिस्त घर हे दिसे, बंदिस्त मी या घरा !!
न मला कोण आठवे, न आठवलो मी कोणा !!

न नाते कोणी जपले, न जपले मी कोणा !!
न कोणी वाट पाहे, न पाहिले मी कोणा !!
अबोल घर हे दिसे, अबोल मी या घरा !!
न मला गृहीत धरले, न धरले मी कोणा !!

न प्रेम कोणी केले, न झाले मज कोणा !!
न लिहिले पत्र कोणी, न लिहिले मी कोणा !!
रिक्त घर हे दिसे, रिक्त मी या घरा !!
न मला कळले ते, न कळलो मी कोणा !!

न हाक कोणी दिली, न दिली मी कोणा !!
न कोणी हरवुन गेले, न हरवलो मी कोणा !!
उनाड घर हे दिसे, उनाड मी या घरा !!
न मला दिसले ते, न दिसलो मी कोणा !!

न साथ कोणी दिली , न दिली मी कोणा !!
न जगले कोण मजसाठी, न जगलो मी कोणा !!
एकटे घर हे दिसे, एकटा मी या घरा !!
न मला सापडे ते, न सापडलो मी कोणा !!

© योगेश खजानदार

•ALL RIGHTS RESERVED•

भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||



भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !!
तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ??
नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !!
तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !!

स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !!
गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ??
क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !!
कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !!

निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे !
रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !!
रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !!
सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !!

वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !!
विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ??
क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !!
तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !!

व्हावी सवय अशी की,  एकांत तुझी सावली आहे !!
मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !!
अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !!
अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुर आहे !!

©योगेश खजानदार

•ALL RIGHTS RESERVED•

पौर्णिमेचा चंद्र || कोजागिरी पौर्णिमा कविता || मराठी कविता || Poems ||



शुभ्र वस्त्र नेसूनी, चांदण्यात मग हरवूनी !!
रात्रीस त्या बोलता,  हळुच तो हसला !!

लपंडाव तो खेळूनी, ढगांसवे त्या धावुनी !!
पौर्णिमेचा चंद्र तो, दुधामध्ये त्या दिसला !!

वारा बेधुंद वाहुनी, क्षणास क्षणभर थांबुनी!!
नजरेत त्या साठवता, मनात तो उरला !!

गारवा तो स्पर्शूनी, शब्दाविना जणू बोलूनी !!
गोडवा त्या ओठांवरी, आज तो राहिला !!

सोबतीस सारे येऊनी, सोबत त्यास देऊनी !!
सुर असे छेडता, चंद्र गाऊ लागला !!

रात्र पुढे जाऊनी, जागेच त्यासवे राहुनी !!
आपुल्यांस त्या क्षणी, प्रेम देऊ लागला !!

गंध सारे पसरूनी, दाही दिशा व्यापूनी !!
पौर्णिमेचा चंद्र तो, लख्ख प्रकाशत राहिला !!

© योगेश खजानदार

•ALL RIGHTS RESERVED•

वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||


वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !!
धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !!
माझ्यात तू दिसता, ओठांवर त्या यावी !!
सखे एक मी, एक तू उरावी !!

गंधाळल्या त्या क्षणांची, आठवण एक लिहावी !!
पाना फुलांचे रंग, सांज बहरून जावी !!
सहज येता लाट, मज तुझ्यासवे पाहावी !!
ओलावता ते मन, पुन्हा परतून जावी !!

गुणगुणावी ती ओळ, ज्यात तू असावी !!
माझ्यासवे भेटीने मग, पूर्ण तू व्हावी !!
सहज छेडूनी तार, चाल ती बनावी !!
सूर असे मिळावे, जणू गीत व्हावी !!

चंद्र तो पाहता, चांदण्यात तू दिसावी !!
नकळत एका क्षणी, हळूच मग लुकलुकावी !!
मी चालता पुढे, माझ्यासवे तू चालावी !!
मी धांबता पुढे , हळुच तू धांबावी !!

श्वास घ्यावे असे, हृदयात तूच राहावी !!
तुझ्याविणा न तेंव्हा, श्र्वासांची ओझी वाहावी !!
कोपऱ्यात त्या कुठे, हळूच तू साठवावी !!
तुझ्या विरहात तेव्हा, अलगद मी जपावी !!

वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !!
धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !!

©️योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

भेटून त्या क्षणांना || मराठी कवितेच्या जगात || Marathi Poems ||



भेटून त्या क्षणांना, आठवांची चित्र द्यावी !!
कुठे रंगीबेरंगी दिसावे, कुठे बेरंग असावी !!
रंगात रंगून तेव्हा, आनंदाची उधळण करावी !!
नुसत्याच त्या रेशांमधून, जीवनाची वाट पहावी !!

सार काही इथेच, तरीही शोधाशोध करावी !!
भरल्या त्या हृदयात, अनोळखी ती पाहावी !!
ओळख त्या आपुल्यांची, अबोल होऊन जावी !!
घर ते स्वप्नांचे , भिंत जिथे उरावी !!

ओढ होईल जाण्याची, मनास आवर घालावी !!
रमून जाईल मन, प्रेमाची उब दिसावी !!
कुठे स्पर्श मायेचा, कुठे ती असावी !!
प्रेम ते नितांत, क्षणास बोलून जावी !!

थांबवावे मग क्षणास, आठवण ती भरावी !!
जाऊच नये कूठे, जणू बांधून ठेवावी !!
कितीही केले तरी, सहज ती सुटावी !!
जून्यास सामावून घेता, लाट नवी यावी !! 

आजचे ते क्षण, उद्याची आठवण व्हावी !! 
सहज जगल्या क्षणांचे, जणू मोती बनवावी !!
बेरंग त्या कागदावर, सहज उतरवून घ्यावी !!
रंग भरल्या जीवनाची, कविता ती व्हावी !!

© योगेश खजानदार

All Rights Reserved 

बंगला नंबर २२ || कथा भाग १० || मुक्ती || शेवट भाग || मराठी भूत प्रेत कथा ||




कथा भाग १० || मुक्ती ||

खोलीतल्या वस्तू देशमुखच्या बाजूने भिरकावल्या जाऊ लागल्या. तो कसाबसा त्यातून वाचला. पण त्याने लगेच आपल्या पँटच्या खिशातून एक पुस्तक काढलं. मोठमोठ्याने तो तंत्रमंत्र म्हणू लागला. तशी माया कमजोर होत चालली. 
"नीच माणसा !! पुन्हा मी कैद होणार नाही ! पुन्हा तुझ्या कैदेत मी राहणार नाही !!" एक सावली देशमुखच्या बाजूने येऊ लागली. पण एक वर्तुळाच्या पुढे तिला काही येता येईना. 
"रांडेचे !! तेव्हाही अशीच विरोध करत होतीस !! आणि आजही तेच !! जा तुला आता कायमच मी या खोलीत कैद करून टाकणार !! " 
देशमुख जोरजोरात मंत्रतंत्र म्हणू लागला. बाहेर प्रिया पळतच श्रीधर जवळ गेली. त्याला मीठी मारून कित्येक वेळ रडत राहिली. श्रीधरला मात्र आत काय प्रकार घडतोय हे कळलं. तो धावतच आत आला. देशमुखला जोरात बुक्की मारत त्याने ते पुस्तक त्याच्यापासून हिसकावून घेतल.
"भाडकाव !! माझ्या बायकोवर वाकडी नजर ठेवतोस !!थांब तुला मी सोडणार नाही !! " असे म्हणत श्रीधर देशमुखला मारत राहिला.
तेवढ्यात मागून कोणीतरी क्षणात त्याच्या डोक्यात काठी हाणली. तो जगताप होता.
"शाब्बास !! दत्तू !! जा त्या प्रियाला घेऊन ये !! तोपर्यंत मी या मायाला इथे कायमचा कैद करून ठेवतो जा !!" देशमुख दरवाजा बंद करत म्हणाला.
जगताप धावत बाहेर गेला. समोर पाहतो तर सायली विचित्र नजरेने त्याला पाहत होती. ती क्षणात जगतापला फरफटत खोलीत घेऊन गेली. 
"साहेब !! मला वाचवा साहेब !! " आणि क्षणात जगतापच्या डोक्यात मार बसतो. तो बेशुद्ध होतो.
देशमुख मात्र मंत्रतंत्र करण्यात गुंग झाला. 
"उठ श्रीधर !!उठ !! आज ही संधी गमावू नकोस !! आज जर मी हरले तर हा नराधम !! तुम्हा सगळ्यांना मारून टाकेन !! उठ !! " माया देशमुखच्या वर्तुळात अडकत चालली होती. ती श्रीधरला साद देत होती. 
"आज आता तुला माझ्यापासून कोणी वाचवू शकणार नाही !! तू संपलीस माया !! एकदा का तुझ काम झालं की मग त्या प्रियाला बघतो मी !! "
देशमुख मोठमोठ्याने हसू लागला. जणू त्याच्या अंगात राक्षसी आत्मा आली होती. मायाचा आवाज ऐकून सारे खोलीच्या दरवाजा जवळ आले.
अचानक त्या खोलीचे सगळे दरवाजे खिडक्या जोरजोरात आदळू लागले. 
"श्रीधर !! " माया मात्र जोरजोरात हाक मारू लागली. रडू लागली.

श्रीधर आवाजाने भानावर आला. समोर उभ्या देशमुखला पाहताच सावरला. उठला आणि त्याच्या हातातले पुस्तक त्याने फाडून टाकले. देशमुख रागावला. श्रीधरच्या अंगावर धावून गेला. तेवढ्यात श्रीधरने त्याच्या डोक्यात जोरात काठी मारली. शुध्द हरपून देशमुख खाली पडला. क्षणात सगळं शांत झालं. श्रीधर धावत बाहेर गेला. पाहतो तर समोर सगळे उभे होते. 
"श्रीधर !! माझी माया कुठे आहे ??"
मंदार मध्येच म्हणताच रांगत रांगत खोलीत गेला. सगळीकडे मायाला शोधू लागला. 
"माया !! माया !! "
अचानक मायाची सावली समोर आली.  
"माया !! " मंदार जवळ जाण्याचा प्रयत्न करत म्हणाला. 
"जवळ येऊ नकोस !! नकोस येऊ माझ्या जवळ !! "
"पण का ??"
"कारण थोडया पैश्यासाठी आपल्या बायकोला नीच गिधाडाच्या तोंडी देणाऱ्या नवऱ्याची सावली सुद्धा मला नको आहे !!"
"काय बोलतेय माया तू !!मी दिलं तुला त्या देशमुखच्या तावडीत !! आणि पैश्यासाठी??"
"हो !! म्हणून तर इतके वर्ष तुला माझी आठवण आली नाही !! विसरून गेलास मला !!"
"माया !! गेली कित्येक वर्ष मी एका खोलीत बंद होतो !! त्या श्रीधरने मला सोडवलं !!म्हणून तर मी बाहेर पडलो !! इतक्या वर्षात या नीच माणसाने माझे हाल हाल केले!! त्यातून मला तुझी काळजी होती !! तू कुठे असशील !! कशी असशील !! काहीच माहीत नव्हतं मला !! " मंदार देशमुखकडे रागाने बघत बोलला. 
"कुठे असेन !! गेली कित्येक वर्ष मी कैद होते त्या झोपाळ्यात!! आपला प्रतीक आपल्या दोघांच्या प्रेमात !! तुझ्या येण्याच्या प्रतीक्षेत !! गेली कित्येक वर्ष मी मरते आहे !! पुन्हा पुन्हा मरते आहे !! या देशमुखने मला एकदा मारल !! पण तू जे वागलास त्या कृत्याने मी क्षण न क्षण मरत राहिले. !!
"कोणतं कृत्य !! "
"हेच की तू मला सोडून गेलास !! पैश्यासाठी !! तुझ्या भविष्यासाठी !!"
"मी सोडून गेलो ! ! नाही माया !! त्या रात्री मी तुझ्यावर अतिप्रसंग केला म्हणून त्याचा जाब विचारायला या नीच माणसाच्या ऑफिस मध्ये गेलो. तिथे याने घात केला. मला खूप मारल. बेशुद्ध पाडलं. आणि त्यानंतर मी कित्येक वर्ष एका छोट्याश्या खोलीत अडकून पडलो. कोणीतरी माणूस यायचा !! जेवायला द्यायचा आणि निघून जायचा !! दिवसातून दोनदा फक्त हेच व्हायचं !! बघ !! माझी अवस्था बघ माया !! मी तुझ्या प्रेमाचा सौदा करेल का ?"
"मग ते सगळं ??"
"खोटं आहे !!" मंदार मायाला सांगू लागला.
"पण त्यानंतर काय घडलं माहितेय तुला ?? या माणसाने माझ्यावर बलात्कार केले!! मला छळ छळ करून मारल !! आपला प्रतीक त्याला तर जिवंत जाळलं. या हराम्याने !!" माया रागात बोलू लागली. 
तेवढ्यात देशमुख भानावर आला. समोरची वस्तू घेत तो मंदारवर धावून गेला. तेवढ्यात जोरात त्याला फेकल गेलं. पुन्हा देशमुख उठण्याचा प्रयत्न करू लागला. पण काठी घेऊन मंदार रांगत त्याच्या जवळ आला. त्याच्या पायावर जोरात त्याने काठी मारली.
"ये मंदार !! हे खूप महागात पडेल बर तुला ! "
"काय करशील रे तू !! "
"तुझा मुडदा पाडील !!" 
अस देशमुख म्हणताच पुन्हा मंदारने त्याच्या पायावर जोरात काठी मारली. देशमुख उठण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याला उठताच येईना. 

श्रीधर, सुहास आणि श्याम धावत दुसऱ्या खोलीत गेले. तिथं सायली जगतापच्या समोरच बसली होती. सुहास तिच्याकडे पाहत म्हणाला. 
"श्रीधर !! चंद्रग्रहण सुरू झालंय !! आपल्याला लवकरात लवकर इथून सायलीला घेऊन जायला हवं ! नाहीतर सगळं काही जळून नष्ट होईल !! "
"म्हणजे !! म्हणजे तू नीट बघ !! त्याच खोलीत तिथे देशमुख आलाय !! ज्याचा बदला मायाला घ्यायचा आहे !! आणि इथे जगताप !! ज्याचा बदला प्रतिकला घ्यायचा आहे !! पण यात सगळ्यात सायली कुठेतरी हरवून गेली आहे !! जर आज प्रतिकने आपला बदला पूर्ण केला आणि तो सायली सोबत निघून गेला तर आपल्याला सायलीच्या प्राणाला मुकाव लागेल !!"
"नाही रे !! अस होऊन चालणार नाही !! काय करावं आपण सांग तरी !! " 
क्षणभर सुहास विचार करतो आणि बोलतो,
"मंदार !! मंदार केळकर आपल्याला मदत करेल !! "
सुहास धावत पुन्हा मंदारकडे जातो. आणि त्याला सगळं काही सांगतो. मंदार जोरजोरात प्रतीकला हाक देऊ लागतो. 
मंदारच्या आवाजाने सायली चारी बाजूंना पाहू लागते.  धावत धावत ती खोलीच्या बाहेर जाऊन पुन्हा खोलीत येते. तेवढ्यात पुन्हा तिला हाक ऐकू येते. ती आवाजाच्या दिशेने जाते. मंदारला पाहताच त्याला मीठी मारते. हे पाहून सुहास थोडा विचारात पडतो. 
"नाही नाही !! हे अस नको आहे !! " आणि पळत तो बंगल्याच्या खिडकीत जाऊन वर पाहतो.
"मंदार हे नकोय !! प्रतीक आणि सायली एक नको आहेत मला !! " 
"म्हणजे?? "
"म्हणजे प्रतीक सायलीवर पूर्णपणे ताबा मिळवतो आहे !! आणि तीही त्याला विरोध करत नाहीये !! "
प्रिया बाजूला उभी राहून हे ऐकत होती. ती म्हणते,
"मग आता काय करायच सुहास !!" प्रियाचा आवाज ऐकताच क्षणभर सायली तिच्याकडे पाहते. 
"आपल्याकडे फक्त आता अर्धा तास आहे !! लवकरात लवकर आपल्याला सायलीला यातून मुक्त करावं लागेल आणि त्यासाठी एकच करावं लागेल. "
"काय ?? " प्रिया विचारते.
"तुझ प्रेम !! सायलीला मनापासून तुझ्याकडे येण्यासाठी हाक दे प्रिया !! "
"बरं !! देते हाक !!"
"सायली !! ये बाळा !! सायली !! ये इकडे !! चल !! " 
प्रियाचा आवाज ऐकताच सायली जोरजोरात हसू लागली. सगळ्या बंगल्यात धावू लागली.  
"ये बाळा !!ये ना इकडे !! हे बघ मी तुझ्यासाठी चॉकलेट आणलेत !!" 
प्रिया कित्येक वेळ सायलीला हाक मारू लागली पण काही केल्या सायली तिच्या जवळ येत नव्हती. 

सुहास पुन्हा विचारात पडला. त्याला काही केल्या कळत नव्हतं की प्रतीक सायलीला का सोडत नव्हता. तेव्हा श्रीधर तिथे समोर येत सायलीला म्हणाला.
"प्रतीक !! जा आई तुझी वाट पाहतेय !!" 
आणि क्षणात सायलीच्या शरीरातून प्रतीक बाहेर पडला. समोर धावत तो आईच्या जवळ जावू लागला. त्या खोलीत मंदारला पाहताच त्याला आनंद झाला. 
"बाबा आले !! बाबा आले !! " त्या खोलीत आवाज घुमू लागला. 
मंदारला काहीच कळत नव्हतं. त्याच्या बाजूने फक्त सावली धावत होती. 

"श्रीधर , प्रिया ,श्याम ,नंदा ,मंदार चला सगळे !! आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही !! " असे म्हणत असतानाच समोरचे दरवाजे जोरजोरात बंद होऊ लागले.
सगळ्या खिडक्या जोरजोरात बंद होऊ लागल्या. सगळे धावत बाहेर जाऊ लागले. 
"पण सुहास माया आणि प्रतीकच्या मुक्तीच काय ??"
"ती मिळणार ना !! "
"कशी ?? त्यांना जिथं पुरलय तिथे त्यांचे उरलेले हाड तरी आपल्याला जाळून टाकावी लागणार ना!!"
"नाही श्रीधर त्याची आपल्याला गरज नाही !! आठव मी काय म्हणालो होतो.!! या ग्रहणाच्या रात्री त्या प्रेतआत्मा तिथेच जातात जिथे त्या शेवटी उरलेल्या असतात !! म्हणजे माया त्या खोलीत आणि प्रतीक वरच्या खोलीत या देशमुखने गाडले ! "
"काय ??"
"होय !! हे खरंय !!"

सगळे बाहेर येत असताना मंदार मागेच थांबला. आणि क्षणात त्याने मुख्य दरवाजा बंद करून घेतला. सगळ्यांनी जोरजोरात तो वाजवला.
"मंदार !मंदार!! " श्रीधर त्याला आवाज देऊ लागला. 
"सगळे तुम्ही या बंगल्याच्या बाहेर जा श्रीधर !! "
"तुला घेतल्या शिवाय नाही जाणार आम्ही !! चल तू !!"
"नाही श्रीधर !! मी तर केव्हाच मेलोय !! कित्येक वर्षांपूर्वी !! आता फक्त हे शरीर उरलं आहे !! "
"नाही मंदार !! नाही !!" 

श्याम ओढत श्रीधरला बंगल्याच्या गेटपासून लांब घेऊन गेला. बंगल्यात मंदार रांगत रांगत किचन मध्ये आला. गॅसचे बटण चालू ठेवून तो पुन्हा खोलीत गेला. 
समोर पाहतो तर देशमुख शुध्दीवर आला होता. अचानक त्याच्या पाठीवर सपासप फटके पडू लागले. तसा देशमुख मोठ्याने ओरडू लागला. जगताप पण असाच ओरडत होता. पुढच्या काही क्षणात बंगला नंबर २२ मध्ये जोरात गॅसचा स्फोट झाला. पाहता पाहता सगळं काही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल. देशमुख आणि जगताप जिवाच्या आकांताने ओरडू लागले. ती आग त्यांना होरपळून काढत होती. त्या आगीत शांत मंदार जळत होता. माया मुक्त होण्यासाठी आपल्या मंदारला भेटण्यासाठी आतुर झाली होती. आगीच्या ज्वाळांनी जगताप जळून खाक झाला. तसे प्रतीक हसतहसत कोपऱ्यात जाऊ उभा राहिला. त्या आगीने रौद्ररूप घेताच समोर कपाटाच्या मागे उरलेल्या त्याच्या शरीराने पेट घेतला.

देशमुख आगीच्या धुराने गुदमरून मेला आणि माया मुक्त झाली. समोर पाहते तर मंदार तिची वाट पाहत उभा होता.
"माझ्यासाठी तू जिवंतपणी या आगीच्या लोटात स्वतःला झोकून दिलस ?? मला माफ कर मंदार कित्येक वर्ष मी तुझा फक्त तिरस्कारच करत आले !!"
मंदराने तिला मीठी मारली आणि म्हणाला.
"गेली कित्येक वर्ष तुझ्या भेटीसाठी आतुर झालो होतो. तुला मिठीत घ्यायला. तुझ्याशी बोलायला मी असे कित्येक आगीचे लोट सहन करेन !!" 
"मंदार !!"  मायाने मंदारला मीठी मारली. 
"आई ?" प्रतीक धावत आला. 
"बाळा !!"  मायाने त्याला कडकडून मिठी मारली. 

तिघेही क्षणात सावली होऊन मुक्त झाले. पुढच्या प्रवासाला गेले. 

"बघ ना प्रिया !! एक वासना माणसाला कोणत्या थराला घेऊन जाते !!" श्रीधर जळून खाक झालेल्या बंगल्याकडे पाहत म्हणाला.
"होना !! प्रेम आणि वासना यातला फरकच अश्या लोकांना कळत नाही !!"

सगळे कित्येक वेळ त्या बंगल्याच्या दिशेने पाहत बसले. आजूबाजूला आता गर्दी जमू लागली होती.
तेवढ्यात बंगल्यातून श्रीधरला आवाज आला,

"श्रीधर मी तुला सोडणार नाही !! मी सोडणार नाही तुला!! श्रीधर !!"

*समाप्त*

बंगला नंबर २२ || कथा भाग ९ || सुटका || मराठी भयकथा ||



कथा भाग ९ || सुटका ||

श्रीधर कित्येक वेळ त्या अपंग झालेल्या मंदार केळकरकडे पाहत राहिला. त्याला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. तेवढ्यात त्या कंपनीच्या बाहेर गाड्यांचा आवाज येऊ लागला.श्रीधर धावत खिडकी जवळ गेला, तर समोर दहा ते पंधरा लोक हातात काठ्या, चाकू, बंदूक घेऊन आले होते. श्रीधर पुन्हा धावत मंदार केळकरकडे आला आणि म्हणाला. 
"चला इथून !! आपल्या मागावर लोक आलेत !! नक्की त्या देशमुखला सगळं खर खर कळलं असणार !!"
"तू कोण पण !!" मंदार श्रीधरकडे बोट करत म्हणाला.
"मी श्रीधर जोशी !! तुम्हाला इथून सोडवायला आलोय !!"
"श्रीधर जोशी ?? पण मला का ??" मंदार केळकर कुतूहलाने विचारतात. 
"सगळ तुम्हाला सांगतो नंतर !! पण आता प्लीज इथून चला !! आपल्या जिवाला धोकाय !! "
"हो पण मी नाही हलू शकत जागेवरून !! जास्तीत जास्त हाताने जवळपास जाऊ शकतो !! तेही फरपटत!! " मंदार पायांकडे पाहत म्हणाला.
"मी घेतो ना तुम्हाला माझ्या पाठीवर !! पण श्याम तू लक्ष ठेव त्यांच्यावर !! ते कुठे आलेत ते बघ !!" 
"हो !! "
 श्याम धावत पुन्हा खिडकीजवळ गेला. हळूच वाकून पाहू लागला. कोणीतरी एक इसम फोनवर बोलत होता.
"तुम्ही काही काळजी करू नका साहेब !! आज इथच त्या श्रीधर आणि मंदारचा मुडदा पाडतो !! त्याच्या सात पिढ्या सुद्धा शोधू शकणार नाहीत !! "
फोन ठेवत तो कंपनीच्या मुख्य दरवाजातून आत येतो. त्याच्या मागे उभे असलेले लोक त्याच्याकडे पाहू लागले. 
"गण्या !! तुम्ही चौघ वरच्या मजल्यावर जावा !! भाणू तू तुझ्या पोरांना घेऊन मागच्या बाजूला जा !! आणि जिथं दिसतील तिथं डोक्यात कोयता घाला !! कळल का ? कळल ना ??"
"होय दादा !!"
"निघा निघा कामाला लागा!! "

श्याम श्रीधरला पळत येऊन लपायला सांगतो. श्रीधर धावतच समोरच्या खोलीत मंदार केळकरला घेऊन जातो. तिघेही शांत बसतात. गण्या आणि त्याचे मित्र शोधत शोधत मंदार केळकरच्या खोली जवळ येतात. पाहतात तर खोलीचा दरवाजा उघडा होता. गण्या जोरात ओरडतो,
"दादा !! म्हातारा नाही खोलीत !!" 
"काय ?? साला घेऊन पसार झाला का काय ??" दादा मोठ्याने म्हणतो.
"माहीत नाही दादा !!पण वर कोणच नाही !!"
"शोधा शोधून काढा त्याला !! नाहीतर त्यो देशमुख जीव घेईल माझा !! "

सगळी पोरं त्या कंपनीत फिरू लागली. कोपऱ्या कोपऱ्यात श्रीधर आणि मंदारला शोधू लागली. 
"इथ बसून काही होणार नाही !! आपल्याला वेळेत बंगल्यावर पोहचलं पाहिजे !! नाहीतर काही खर नाही !!"
"पण करायचं काय ??"श्याम हळूच विचारतो. 
क्षणभर श्रीधर विचार करतो आणि म्हणतो. 
"चला !! लपत लपत चला!!" हळू हळू लपत श्रीधर त्यांना बोलतो. 

श्याम आणि श्रीधर सगळ्यापासून लपत मार्ग काढू लागतात. श्रीधर मंदारला पाठीवर घेऊन चालत राहतो. तेवढ्यात दादाचा फोन वाजतो. सगळे शांत होतात. 
"नाही इथ श्रीधर !! पळाला तो देशमुख साहेब !!" 
असे दादा म्हणताच श्रीधर श्यामला आणि मंदारला घेऊन कंपनीच्या मेन डोअर जवळ येतो. धावत धावत तो समोरची गाडी चालू करण्याचा प्रयत्न करतो. क्षणात ती गाडी चालू होते. त्या आवाजाने सगळे बाहेर पळत येतात. श्रीधर गाडी घेऊन पळून जाण्यात यशस्वी होतो. दादाला हे लक्षात येताच त्याने देशमुखला फोन लावला. 
"श्रीधर पळाला साहेब !! आत्ताच पळाला !! त्याच्या सोबत तो मंदार केळकर सुद्धा आहे !!"
"काय !!अरे भाडकावानो तुम्ही काय करत होतात तिथं !!"
"आम्ही शोधतच होतो पण तेवढ्यात आम्हाला चुकवून केव्हा पळाला कळलं नाही !!"
"बरं !! ते जाऊ दे आता पाठलाग कर त्याचा !! बंगल्यावर गेला तर तिथं हान भाड्याला !! ठेव फोन चल !"

देशमुख साहेब रागात फोन जमिनीवर आदळतो. आणि म्हणतो,
"दत्तू !! बंगल्यावर जायचं !! आत्ताच्या आत्ता बंगल्यावर जायचं आपल्याला !! तो श्रीधर तिथं पोहचायच्या आता त्याच्या पोरीचा आणि त्याच्या बायकोचा गेम करायचा !! त्या श्रीधरची पण समाधी आता त्याच बंगल्यात पुरायची !! चल !! चल !! त्याच्या बायकोला हिसका दाखवू !!"

देशमुख आणि जगताप दोघेही गाडी घेऊन बंगल्यावर जायला निघाले. रक्ताने भरलेले हात तसेच घेऊन जगताप बंगल्याजवळ आला. आणि देशमुखकडे पाहत म्हणाला.
"साहेब आपली माणसं पुढं पाठवू का ??"
"नाही नको !! सगळे बरोबरच जाऊ !! मलाही आता त्या प्रियाला कधी एकदा मिठीत घेईल अस झालंय रे !!" 
"मला पण !!" जगताप मिश्किल हसत म्हणाला. 
"चला रे !! घुसा त्या बंगल्यात आणि दिसल त्याला बांधून ठेवा !!"

देशमुखने सांगताच सगळे पोर बंगल्यात घुसले. सुहासला आणि नंदाला त्यांनी एका खुर्चीला बांधलं. मात्र सायलीला काही त्यांना बांधता येईना. 
"साहेब !! या पोरीला दोरीन बांधून ठेवणं लई अवघड आहे !!"
"काय पाहिजे तुम्हाला !! का आमचा तुम्ही असा छळ करताय !! " प्रिया मध्येच बोलते.
"मला तू पाहिजे !! म्हटलं होत ना मी तुला !!" देशमुख असे म्हणताच अंगणातला पाळणा जोरजोरात हलू लागला. त्या जवळून चित्रविचित्र आवाज येऊ लागले. 
ते आवाज ऐकताच देशमुख मोठ्याने ओरडला. 
"ये माया ! आजुन जोर गेला नाही का तुझा ?? एकदा मेलीस अजून किती वेळा मरायचं आहे तुला ?? ये दत्ता फोन लाव त्या भाडकाव श्रीधरला फोन लाव !! ये म्हणावं आता तुझ्या बायकोला वाचवायला !! जास्त हुषार व्हायचा प्रयत्न करत होता ना !! ये म्हणावं आता !!"

देशमुखने बंगल्याच्या चारी बाजूने आपली माणसं उभी केली. त्याच्या मर्जी शिवाय कोणी तिथं फिरकू ही शकत नव्हतं. 
"हे घ्या साहेब !! लावला फोन !!"दत्तू फोन देशमुखकडे देत म्हणाला. 
श्रीधर मात्र जेवढ्या लवकर येता येईल तेवढ्या लवकर फास्ट गाडी चालवत होता. थोड्या पुढे जाताच त्याच्या लक्षात येत की आपल्या मागे गुंड लागलेत. त्यांना गुंगारा देत श्रीधर बंगल्याच्या दिशेने गाडी पळवत होता. फोन वाजताच त्याने फोनकडे पाहिलं. देशमुखचा फोन पाहताच त्याला आश्चर्य वाटलं, त्याने फोन उचलताच देशमुख म्हणाला,
"काय श्रीधर !! मंदार केळकरला घेऊन चालला वाटत !!"
"भाडकाव तू किती नीच आणि खालच्या थराचा आहेस हे कळलय मला !! तुझ्या सगळ्या पापाची शिक्षा तुला भोगावीच लागेल."
"खर का ?! आणि कोण देणार शिक्षा मला ?? तू ?? का तो लंगडा केळकर ?? कोण देणार मला शिक्षा ?? "
"जास्त माज नको करू देशमुख !!"
"ये गप्प !!आवाज नको करू !! एवढाच जोर आहेना तर ये वाचव तुझ्या बायकोला !! "
"प्रिया?? !! ये भाडकाव !! तिच्या केसाला जरी धक्का लागला ना तर तुला सोडणार नाही मी !! "
"अस ?? मग तर लावून बघावाच लागेल !!"
एवढं बोलून देशमुख फोन कट करतो. 

"देशमुख बंगल्यात शिरलाय ! आपल्याला लवकरात लवकर जाव लागेल !! "
"तिथे सुहास ??माझी बायको नंदा आहे !! "श्याम.
"बहुतेक त्यानं सगळ्यांना बंदी बनवलय !!" 
"हा देशमुख सुधारणार नाही !! असच त्यानं माझ्या मायावर पण प्रयत्न केला होता !! नीच माणूस आहे तो !! " मंदार मध्येच म्हणाला.

श्रीधर वाऱ्याच्या वेगाने गाडी पळवू लागला. इकडे देशमुखने प्रियाला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न चालू केला.
"ये प्रिया !! आजिबात घाबरु नकोस !! हे बघ माझी हो मी तुला काही कमी पडू देणार नाही. !! ये जवळ !! "
"नीच माणसा !! तुला थोडी तरी लाज आहे का रे ??"
"नाही ना !! लाज काय त्यात !! तू मला हवी आहेस !! "देशमुख जवळ येत म्हणाला. 

अंगणात झोका जोरजोरात हलू लागला. चित्रविचित्र आवाज येऊ लागले. सायली खोलीत मोठमोठ्याने वस्तू आदळू लागली. दरवाजा वाजवू लागली. तिच्या आत असलेला प्रतीक मोठमोठ्याने आईला बोलावू लागला.
"ये ! गप्प बसते का नाही तू ?? साली रांड !! त्या झोक्यात बस की गप्प !!" देशमुख मोठ्याने ओरडला. 
तेवढ्यात झोका शांत झाला. सुहास मात्र सगळं समजला. आपली आणि नंदाची सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करू लागला. श्रीधर,श्याम आणि मंदार केळकर येईपर्यंत आपण त्याचा प्रतिकार करावा अस त्याला वाटत होत. पण बांधलेल्या रस्सितून त्याला काही केल्या सुटता येत नव्हतं. 

श्रीधर बघता बघता बंगल्या जवळ आला. गाडी त्याने थेट बंगल्याच्या गेटवर आदळली. सगळे चकित झाले. देशमुख सुद्धा आवाजाने सावध झाला आणि म्हणाला, 
"काय झालं रे ??"
"साहेब !! श्रीधर आलाय !! त्या मंदार केळकरला घेऊन !!" दत्तू म्हणाला. 
"हरामखोरला त्या तिथंच मारा !! जिवंत सापडला नाही पाहिजे !! पळा !!" देशमुख आवेशात म्हणाला. 

देशमुख प्रियाला फरफटत त्याच खोलीत घेऊन जाऊ लागला. 
"आता तुझं आणि तुझ्या नवऱ्याच काही खर नाही !! " 
"सोड मला !! सोड !! अरे तू माणूस आहेस का सैतान आहेस !! " प्रिया स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न करत म्हणाली. 
"आता तुझी सुटका नाही !! ते बघ !! !"
खाली अंगणात श्रीधर ,श्याम आणि मंदारला देशमुखच्या गुंडांनी घेरल होत. 
"तुला वाटतं आता तुझा नवरा जिवंत राहील??"
"श्रीधर !! श्रीधर !!" प्रिया मोठ्याने ओरडली.
"चल !! " देशमुख तिला खेचत घेऊन चालला. 

खाली अंगणात सगळे श्रीधर आणि श्यामवर तुटून पडले. झटपट करत त्यांना मारण्याचा प्रयत्न करू लागले. काहींना श्यामने एका फटक्यात लोळवल. तर काहींनी त्यांना बेदम मारल. कशीबशी त्यांच्यापासून सुटका करत श्याम आणि श्रीधर मंदारला घेऊन सुहास जवळ आले. सुहासला त्या दोरीतून मुक्त करत त्याला म्हणाले.
"कुठ गेलाय तो ??"
"त्या खोलीत ??पण श्रीधर तो झोपाळा पहिले नष्ट कर !! जाळून टाक !! त्या मायाला मुक्त कर त्यातून !! त्या नीच माणसाने तिला त्यात कैद करून ठेवलंय !! "
श्रीधर धावतच किचन मध्ये गेला. रॉकेलची बाटली झोपाळ्यावर ओतून त्याने त्याला आग लावली. 

"मायाची सुटका म्हणजे ??" मंदार मध्येच म्हणाला. सुहास त्याला सावरू लागला. श्रीधर धावत खोली जवळ पळाला. दरवाजा जोरजोरात ढकलू लागला. 
"ये हराम्या देशमुख !! दरवाजा उघड नाहीतर तुझं काही खर नाही !!"
"अरे निघ रे !! नाही उघडत !! " 
श्रीधर धावत खिडकी जवळ गेला. जोरात हिसका देऊन त्याने खिडकी उघडली. समोर देशमुख प्रियाकडे पुढे पुढे चालून जात होता. तेवढ्यात खोलीतला पलंग अचानक हवेत फेकला गेला. अचानक सगळ्या वस्तू जागेवरून उधळल्या जाऊ लागल्या. क्षणात दरवाजा उघडला गेला. प्रिया धावतच बाहेर गेली. प्रिया बाहेर जाताच दरवाजा बंद झाला. 

"ये !! ये !! माया !! तुला सोडणार नाही बरका मी !! गप निघून जा इथून !! निघून जा !!" देशमुख सगळीकडे पाहत म्हणाला. 
"निघून जाऊ !! तू मेल्याशिवाय माझी सुटका कशी होणार ??"
"कोण मारणार मला !! तू ??"
असे म्हणताच देशमुख जोरजोरात हसू लागला. 
"आठवत ना !! गेली कित्येक वर्ष त्या झोपाळ्यात अडकवून ठेवणारा मीच होतो ते !! "
"नीच माणसा !! तुला मी सोडणार नाही !! तुला मी सोडणार नाही !!"

खोलीतल्या सगळ्या वस्तू जागेवरून उधळल्या जाऊ लागल्या. त्या खोलीत जणू वादळ आल होत.

क्रमशः

बंगला नंबर २२ || कथा भाग ८ || शोध || मराठी भयकथा ||




कथा भाग ८ || शोध ||

श्रीधर केबिनमध्ये येताच आपलं काम करत बसतो. थोड्या वेळाने आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही हे पाहून तो लॅपटॉप मध्ये ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांचा डेटा चेक करू लागतो. दोन तीन वेळा त्याने मंदार केळकर नावाने जुना डेटा काढण्याचा प्रयत्न केला तरी त्याला अश्या नावाचा कोणी कर्मचारी नव्हताच हे दिसून येत होत. पुन्हा पुन्हा तो चेक करत होता पण उत्तर काही बदलत नव्हतं. शेवटी न राहून तो ऑफिसमधील जुन्या एका कर्मचाऱ्याला विचारतो.
"पंडित , आपल्या ऑफिसचा कर्मचाऱ्याचा डेटा कुठे आहे ??"
"तो आहे की लॅपटॉप मध्ये!!"
"तो नाही !! जुना !! कारण नव्यात खूप एरर्स आहेत !! ते नीट करावे लागतील !!"
"ऑफिसच्या खाली अडगळीच्या खोल्या आहेत त्यात असतील !!त्याची चावी मात्र साहेबांच्या केबिन मध्ये असते !!"
"ठीक आहे पाहतो मी !! "
श्रीधर हळू हळू देशमुख साहेबाच्या केबिनमध्ये जाऊ लागतो. पण त्याला समोर बघून तो क्षणभर थांबतो. दुसरीकडे पाहू लागतो. थोड्या वेळाने साहेब केबिन मधुन बाहेर जातो. श्रीधर सर्वांची नजर चुकवून आत जातो. सगळीकडे शोधाशोध करू लागतो. पण काही केल्या त्याला चावी भेटत नाही. शेवटी टेबलच्या खाली एका कोपऱ्यात त्याला चावीच बंडल भेटत. 
"बहुतेक यातच असणार ती चावी !! "
हळूच खिशात बंडल ठेवत तो बाहेर येत असतो. तेवढ्यात त्याला समोर देशमुख साहेब भेटतो. 
"श्रीधर ?? माझ्या केबिनमध्ये ??"
"ते !! ते !! काही फाईल्स ठेवल्या होत्या इथे त्याच घ्यायला आलो होतो.!! "
"मग कुठे आहेत फाईल्स??" श्रीधरच्या रिकाम्या हाताकडे बघत देशमुख म्हणाला.
"जी पाहिजे होती ती नाही मिळाली !! बहुतेक जगतापांकडे असेल !!"
"बरं बर !! भेटले का मग जगताप ??"
"नाही ना !! सकाळपासून त्याची भेटच नाही !! आणि फोनही लागत नाहीये !! "
"मला भेटले की सांगतो मी त्यांना तुम्हाला भेटायला !!"
"ठीक आहे साहेब !!"

श्रीधर चावी घेऊन खाली खोलीत येतो. समोर त्याला दहा बारा खोल्या बंद असलेल्या दिसल्या. त्यातली प्रत्येक खोली तो अथक प्रयत्न करून उघडतो. त्यातील पाच सहा खोल्या तर रिकाम्याच होत्या. शेवटी एका खोलीत त्याला भरपूर रद्दी झालेले कागद दिसू लागतात. हळूच त्या खोलीत तो जातो.एक एक डाटा चेक करतो. खूप वेळ प्रयत्न केल्यावर त्याला जुन्या कर्मचाऱ्याचा डेटा मिळतो. जुने रजिस्टर बुक पाहतो. त्यात मंदार केळकरच नाव शोधतो. 
"असणार यात नक्की असणार !! त्याच नाव !! मंदार !! मंदार !! मंदार केळकर!! हे सापडलं !!" श्रीधर रजिस्टर मध्ये बघत म्हणतो.
थोडा वेळ वाचतो. 
"यात १७३ सोहम सुभेदार आहे !! आणि १७४ मंदार केळकर !" मंदार तिथे लावलेला मंदारचा! फोटो क्षणभर पाहत राहतो . आणि म्हणतो,
 "पण या पुढच्या महिन्याच्या बुकमध्ये त्याच नावच नाहीये !! मंदार केळकरच नाव एका महिन्यात या बुक मधुन गायब झालं. पण या दुसऱ्या बुक मध्ये कर्मचारी कोणत्या कामा निमित्त बाहेर गेलेत ते लिहिलं आहे !! यात मंदार केळकर १८ जुलैला मात्रो कंपनीला विजीट द्यायला गेले ते शेवटचं !! त्यानंतर या पुढच्या कुठल्याच रजिस्टर बुक मध्ये केळकरच नाव नाही. म्हणजे त्या मात्रो कंपनी मध्येच काहितरी गुड आहे!! शोधायला हवं !! "
श्रीधर खोलीतून बाहेर पडतो. चाविच बंडल तिथेच फेकून देतो.  धावत धावत आपल्या केबिनमध्ये येतो. सुहासला फोन करून सगळं सांगतो. तिथे काय परिस्थिती आहे हे जाणून घेतो. 
"मला वाटतं तू याबद्दल श्यामला विचार त्याला नक्की याबद्दल माहीत असणार !! "सुहास फोनवर श्रीधरला सांगतो. 
"आहे तो तिथे ??"
"हो माझ्या जवळच थांबलाय ! बोल त्याला!! "
सुहास फोन श्यामकडे देत म्हणतो. 
"हा साहेब ??"
"श्याम !! तुला मात्रो कंपनी विषयी काही माहीत आहे का रे ??"
"हो साहेब !! आपल्या साहेबांची आहे ती कंपनी !! पण खूप वर्षांपूर्वी म्हणजे वडील असतानाच बंद पडली ती !! "
"मला दाखवशील कुठे आहे ती ??"
"हो !! "
"मी आलो लगेच मग !! आपल्याकडे वेळ खूप कमी आहे !!"
"ठीक आहे साहेब !!"

श्याम असे म्हणताच मागे दरवाजा जोरात आदळला जातो. जगताप पूर्ण ताकदीनिशी खोलितून बाहेर पळत जातो. श्याम आणि सुहास त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात पण दोघेही अपयशी ठरतात. जगताप धावत धावत बंगल्यातून पळत बाहेर पडतो. दोन्ही हात रक्तबंबाळ झालेले तो तशेच घेऊन जिवाच्या आकांताने पळत सुटतो. 

इकडे मात्र श्रीधर फोन ठेवून विचार करत बसतो. थोडा वेळ विचार झाल्यावर तो साहेबांकडे जातो. आणि घरी जाण्याची परवानगी मागतो. 
"का रे ?? असे अचानक ??"
"सायलीला बर वाटत नाहीये !!"
"काय झालं तिला ??"
"माहीत नाही !! पण प्रिया म्हणाली तिला हॉस्पिटल मध्ये न्ह्यावं लागेल. "
"ठीक आहे!! जा तू !!"

श्रीधर लगबगीने बाहेर पडतो. मात्रो कंपनीकडे निघून जातो. श्रीधर जाताच , मागून जगताप धावत पळत येतो. ऑफिसमध्ये मोठ्यामोठ्याने रडत येतो. त्याला तसे पाहून सगळे अचंबित होतात. पाहू लागतात. देशमुख साहेब पळतच बाहेर येतो.
"साहेब !! " जगताप रडत म्हणतो. 
"काय झालंय दत्तू ?? कोणी केली तुझी अवस्था ही ??"
"तिने केली !! जीव घेतला असता माझा आज तिने !!"
जगताप असे बोलताच. देशमुख त्याला गप्प बसायला सांगतो.  जमलेल्या बाकीच्या कर्मचाऱ्यांना पाहून आपापल्या कामावर जायला सांगतो. जगतापला केबिनमध्ये घेऊन येत म्हणतो.
"कोणी केली अवस्था तुझी ??"
"माया ने !! तिच्या पोराने !! "
"साली रांड !! मेल्यावर सुद्धा हीचा जोर जात नाही तर !!" देशमुख रागाने म्हणतो. 
"त्या श्रीधरला सगळं कळलय साहेब ! त्या मंदार केळकर बद्दल सुद्धा कळलय !!"
"कोणी सांगितलं ?? "
"त्या श्याम आणि त्याच्या बायकोने !! "
"भाडकाव!! साला बापा सारखाच दगाबाज निघाला हा पण !!"
"त्या श्रीधरच्या पोरीच्या अंगात जाऊन बसलय ते पोर त्या मायाच !! " 
"एक मिनिट एक मिनिट !!" देशमुख साहेब लॅपटॉप जवळ जात म्हणाला. त्याला श्रीधरचा संशय येतो. 

लॅपटॉप मध्ये त्याने थोडया वेळा पूर्वीचे सीडीटीव्ही फुटेज पाहिले. आणि ते पाहताच तो धावतच खाली अडगळीच्या खोलीकडे गेला. समोर अस्थाव्यस्थ पडलेल्या फाईल्स आणि त्यात मंदार केळकर यांच्या नावाची फाईल समोर पाहून देशमुख रागाने लाल झाला. पुन्हा धावत तो जगताप जवळ आला. जगताप तेव्हा आपल्या झालेल्या जखमामुळे विव्हळत होता. 
"दत्ता !! ये दत्तू ?? आपल्या मात्रो कंपनीत आता कोण आहे का रे ??"
"नाही !! संध्याकाळी तेवढा किसण्या जातो तिथं !! "
"आत्ता जा म्हणावं!! फोन कर किसण्याला फोन कर !! म्हणावं आपली माणसं घेऊन कंपनीत जा !! "
"हा !! "जगताप फोन घेण्याचा प्रयत्न करतो पण काही केल्या त्याचा हात उचलत नाही. त्याला पाहून देशमुख म्हणातो.
"सोड जाऊदे !! मीच लावतो फोन !!" 
खिशातला फोन काढत म्हणाला. 

श्रीधर या पुढच्या येणाऱ्या संकटाला अनभिज्ञ होता. श्यामला घेऊन तो त्या कंपनीत जातो. पाहतो तर त्या कंपनीत खोल्याच खोल्या होत्या. 
"आता कुठ रे शोधायचं ??"
"तुम्ही खालच्या मजल्यांवर शोधा !! मी वरती पाहतो!! " श्याम वर जात म्हणाला.

चारही बाजूने घनदाट झाडी असल्याने त्या कंपनीत दिवसाही अंधार पडला होता. आजूबाजूला म्हणावं अस कोणच नव्हतं. अगदी निर्मनुष्य अश्या जागेवर ती बंद पडकी कंपनी जणू एखादा भुत बंगला वाटत होती.

"या मंदार केळकर विषयी काहीतरी पुरावा मला इथे मिळेल अस वाटतंय खर पण !!" समोर असलेली खोली उघडत श्रीधर म्हणाला. खोली उघडताच पाच सहा वटवाघळे त्याच्या डोक्यावर उडू लागतात. त्यांना तो हाकलून देण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात श्याम मोठ्याने ओरडतो. श्रीधर त्या दिशेने धावत जातो. पाहतो तर समोर हाडांचा सांगाडा खोलीत पडला होता. 
"श्याम !! मंदार केळकरला मारून तर टाकलेलं नसेल ना ??"
"काय सांगत येत नाही याच !! मला पण हेच वाटायला लागलंय !! नक्की त्या मंदार केळकरचाच असणार ह्यो सांगाडा !! "
"आता ??"
"इथच शोधू अजून काय भेटत का ते !! "
"हो चालेल !!शोध !! "

श्रीधर आणि श्याम कित्येक वेळ त्या खोलीच्या आजूबाजूला शोधत राहतात. पण त्यांना तिथे काहीच मिळत नाही. शेवटी दोघेही हतबल होऊन घरी जायला निघतात. तेवढ्यात त्यांना त्या सूनसान जागेत कोणी पुरुष गाणे म्हणत असल्याचा आवाज येतो,
"तुला आवाज येतोय श्याम ??"
"होय साहेब !!"
"या एवढ्या मोठ्या कंपनीत हा कोण असेल बर ??"
"जाऊद्या साहेब !! चला आपण !! नको जायला कुठ !! आपलं घरी जाऊ !! नक्की भुताटकी असणार !! "
"नाही रे !! बघ ना त्याच्या आवाजात किती दुःख जाणवत आहे !! अस वाटत कोणी प्रियकर आपल्या प्रेयसीच्या भेटीसाठी आतुर झाला आहे !! चल ना बघुयात कोण आहे तो ??"
"साहेब !! नको !! नको !! भुताटकी असणार !! उगा माग लागलं आपल्या !! "
"काही होत नाही चल !!"

श्रीधर आणि श्याम हळू हळू चालत चालत त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागतात. तसा तसा तो आवाज अजून मोठा येऊ लागतो. अगदी जवळ येताच श्यामच्या पायाचा आवाज होतो.  आवाजाने ते गान बंद होत. आणि पलीकडे खोलीतून आवाज येतो,
"ये !! ये ! कोणय ?? ये सांग की आज वार कोणता ते तरी सांग !! ये ये !! तू कोण आहेस ??"

आतून जोरात ओरडण्याचा आवाज येतो. श्रीधर धाडसाने त्याच्या समोरचा दरवाजा तोडू लागतो.श्याम मात्र भिऊन मागे थांबतो,

"नको साहेब !! आहो कोणी भुतं असलं हो इथे !! बघा ना किती सुनसान आहे !!" श्याम भीत म्हणाला.
"श्याम !! मलाही आता त्या भुताला भेटायचं आहे !! " श्रीधर जोरात एक दगड त्या दरवाज्यावर घालतो.
"ये !! मला घेऊन जायला आला तू ?? मला घेऊन जाणार ?? मला ???" आतून मोठ्याने हसण्याचा आवाज आला. 

श्रीधर आणि नंतर श्यामने मिळून दरवाजा तोडला. समोरच चित्र पाहून दोघेही स्तब्ध झाले. काय बोलावं त्यांना काहीच कला नाही,

" मला !! मला मला घेऊन जाणार तुम्ही ??"
समोर कोणी एक दाढी वाढलेला, केस पांढरे झालेला, म्हातारा पडून होता,. या दोघांना पाहून तो हाताच्या बळावर पुढे येण्याचा प्रयत्न करू लागला, दोघेही मागे मागे सरकू लागले. 
श्रीधर शांत होता. तो पुसटस बोलला
"मंदार केळकर ??"
"हो हो !! मीच मंदार केळकर !! मीच मंदार केळकर !!"

क्रमशः 

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...