सुर्यास्त ... !!! कथा

सूर्यास्त .....!!!! (कथा)

लेखन -योगेश खजानदार

*************************

सुर्यास्त ...!!! (कथा भाग १)

#Yks

"काकु !! समीर कुठे आहे ?? सायली समीरच्या घरात येत म्हणाली.
"संध्याकाळची वेळ!!! म्हणजे समीर गच्चीवर असणार ना!! समीरची आई सायलीकडे पहात म्हणाली.
सायली काहीच न बोलता थेट गच्चीवर जाऊ लागली. समीर गच्चीवर काहीतरी लिहिण्यात मग्न होता. सुर्यास्त होताना पाहायला त्याला खूप आवडायचं. सायलीला समोर पाहताच त्याने त्याची वही बंद केली.
"काय लिहितोय समीर?? सायलीला अचानक पहाऊन समीरला काय बोलावं तेच कळेना.
"काही नाही ग जनरल लिहीत होतो!!  समीर स्वतःला सावरत म्हणाला.
"प्रेम पत्र लिहितोय की काय कोणाला?? सायली मिश्किल हसत म्हणाली.
"प्रेम पत्र आणि मी ?? शक्य आहे का ते ?? "
"बरं बरं ते जाऊदे !! तु रोज संध्याकाळी काय करतोस पण इथे??"
"तो दुरवराचा सूर्य बुडताना पाहायला खुप आवडत मला !! " समीर लालबुंद सूर्याकडे पहात म्हणाला.
"रोज??"
"हो रोज !! रोज नवीन वाटतो तो मला !! अगदी मला बोलतो तो सूर्य !! " समीर सायलीच्या डोळ्यात पहात म्हणाला.
"पण ते जाऊदे !! तु इथे काय करतीयेस??"
"अरे!! राहिलाच बघ !! अरे मी तुला पुस्तक द्यायला आले होते !! हे घे तुज पुस्तक!! "
"वाचलं तु पुस्तक हे ??"
"हो वाचलं , किती सुंदर आहे हे पुस्तक !! मला ते तुला द्यायचंय न्हवत पण म्हटलं तुला हवं असेन म्हणून आले !!"
"तुला अवडल असेन तर राहुदे पुस्तक तुझ्याकडेच, हाकेच्या अंतरावर तर असतेस वाटेनं तेव्हा घेईन मी तुझ्याकडुन!!!"
"खरंच!! "
"हो खरंच राहुदे.!! समीर तिच्याकडे हसत म्हणाला.
सुर्य आता पुर्ण बुडाला होता. अंधाराने स्वतःचा पसारा मांडायला सर्वात केली होती. त्या सुर्यास्ता कडे पहात समीर अचानक बोलला

"कधी वाटे उगाच का
ओढ मनास ती लागे
तुझ्या जाण्याने मझ का
कोणती हुरहूर ती लागे

नसेल तुलाही विरह नको हा
चंद्र ताऱ्यात सोबती तु आहे
कधी सोबती मज कोणी तर
कधी एकांती तुझी सोबत आहे!!

कधी वाटे उगाच का
ओढ मनास ती लागे!!" समीर कविता म्हणत सायली कडे पाहू लागला. कित्येक वेळ सायली फक्त त्याच्याकडे पाहताच होती.
"समीर किती सुंदर आहे !!! कोणी लिहिली आहे रे ??" सायली समीरला विचारू लागली.
"काही माहीत नाही कोणी लिहिली, पण मनातुन भावना बोलल्या एवढंच!"
" बरं चलं मी जाते !! आई वाट पहात असेन माझी!!  " सायली समीर पासून दुर जात म्हणाली.
कित्येक वेळ ते शब्द तिच्या मनात तसेच घोळत होते.
समीर जाणाऱ्या सायलीकडे कित्येक वेळ पहात होता. सुर्यास्त केव्हाच झाला होता. त्या वहीत काहीतरी लिहिलं होत पण काय हे सायलीला का सांगितलं न्हवत . काही कळत न्हवत. सायली समीरच्या शेजारीच राहायला होती. रोज भेटही होत होती कदाचित ती वही सगळं काही लिहून घेत होती.
"समीर , अरे काय त्या वहीत लिहीत असतोस सारखं आम्हाला ही कधी वाचायला दे !!" आई समीर कडे पाहत म्हणाली.
"आई तुला वाचून दाखवणार नाहीतर कोणाला ऐकतेस ??" समीर गच्चीवरून खाली येत म्हणाला.
"हो ऐकते!!" आई समीर समोर येत म्हणाली.

"पाठमोऱ्या तुला जाताना
थांबवावे वाटले मला
पण पुन्हा भेटण्याची ओढ मला
थांबवत होती तेव्हा

त्या वाटेवरून जाताना
पुन्हा वळावे वाटले होते मला
पण पुन्हा नव्या वळणावर
भेटायचे होते तुला

कधी मनातलं सारं
सांगायचं होतं तुला
पण पुन्हा नव्या किवेतेमधे
लिहायचं होत मला ...!!" समीर आईकडे पहात कविता म्हणाला.
"समीर प्रेमात वैगेरे नाहीस ना तू कोणाच्या ??"  आई गालातल्या गालात हसत म्हणाली.
"प्रेम आणि मी !! नाही ग आई !! " समीर घरातुन बाहेर जात म्हणाला.

क्रमशः

*********************************

सुर्यास्त..!! (कथा भाग -२)

#Yks

"काहीही म्हणते आई !! " समीर मनातल्या मनात म्हणाला.
सायली घरातून बाहेर येत समीरकडे पाहू लागली. कित्येक वेळ ती तिथेच उभा होती. समीर आणि तिची भेट सारखीच होत असे. तो सतत तिच्या नजरेस पडत असे. दोघांमध्ये येता जाता बोलण होत.
"समीर अरे मला तुझी थोडी मदत हवी होती!!"  सायली जाणाऱ्या समीरकडे पाहत म्हणाली.
"अरे वाह !! सायलीला चक्क माझी गरज पडावी!! क्या बात है!! " समीर सायलीकडे हसत म्हणाला.
" हो अरे !! मला काही विचारायचं होते तुला !! "
" विचार ना !! " समीर उत्सुकतेने म्हणाला.
"नाही जाऊदे !! नंतर विचारते !!! आत्ता नको!! "
"सायली विचार तरी !!!" समीर सायलीला म्हणाला.
"समीर माणूस प्रेमात पडलेले कसे कळते रे !!" सायली अचानक म्हणून गेली.
समीरला या प्रश्नाचं उत्तर कसे द्यावे तेच कळतं न्हवते. तो कित्येक वेळ शांत राहिला.
"तुला का हे विचारावं वाटलं सायली? कोणाच्या प्रेमात पडली आहेस का??
" नाहीरे !! असं काही नाही .!! सहजच विचारते तुला मी!! "
"पण सायली प्रेमात पडलेले कळतं अस नाही !! पण ते लक्षात येत असही नाही!! तु कदाचित कोणाशी प्रेम करत ही असावीस पण तुला ते तेव्हाच कळेल जेव्हा तुला त्या व्यक्तीचं असणं आनंद देईन आणि त्याचा विरह अश्रू!! "  समीर सायलीच्या डोळ्यात पहात म्हणाला.
"समीर तु प्रेम करतोस कोणावर??"
समीर काहीच न बोलता निघून गेला. कित्येक वेळ सायली त्याच्या प्रेमाची व्याख्या आठवत होती. आनंद आणि अश्रू यातच प्रेम कसे असेल? याचा हिशोब ती करत होती. कदाचित समीरला काहीतरी बोलायचं असेन पण ते शब्द कुठेतरी विरले असतीन का असे तिला वाटत होते.
  समीर आता मित्रासोबत बाहेर आला होता. त्याच्या मनात सायली बद्दल अनेक विचार फिरत होते.
"समीर अरे कोणत्या विचारात आहेस?" समीरचा मित्र सचिन त्याला म्हणत होता.
"काही नाहीरे सचिन, सायली आज प्रेम म्हणजे काय विचारत होती मला !! पण तिला बोलता बोलता मीच शांत झालो !!"
"काय विचारलं तिने अस??" सचिन समीरला विचारू लागला.
"प्रेम करतोस कोणावर अस विचारत होती मला !!"
"समीर बहुतेक ती तूषारच्या प्रेमात आहे!! मध्ये मी तिला पाहिलं होत त्याच्या सोबत!! नक्कीच त्याच्यात काहीतरी आहे समीर !! "
सचिनच्या या बोलण्याने समीर नक्कीच मनात कुठेतरी दुखावला होता. पण का ??  मनात कुठेतरी  सायली बद्दल असलेली प्रेमाची भावना समीरला शांत बसू देत न्हवती.
" ती कविता तिच्याकडे पाहूनच सुचली होती ना ?? " समीर मनातल्या मनात विचारत होता.पण तिचं तर प्रेम नाही आपल्यावर. मग सायली अस का विचारत होती मला? असे कित्येक विचार करत समीर घरी आला. नीट जेवला ही नाही.
सचिन ने सांगितल्या पासून समीरच वागणं सायली बद्दल पूर्ण बदलून गेलं होत. तो आता तिच्याशी थोड तुटकच बोलू लागला होता. आणि ही गोष्ट सायलीच्या ही लक्षात आली होती. तेव्हा
"समीर अरे कुठे आहेस ??" सायली समीरच्या समोर येत म्हणाली.
"आहे इथेच, कुठे जाणार दुसरीकडे??"
"भेटलाच नाहीस म्हणून विचारलं!! "
"रोज भेटाव अस काही आहे का ??"
"समीर तु असा का बोलतोयस ??"
"मग कस बोलायचं सांग मला !!!"
"काहीं झालंय का ?"  सायली समीरकडे पाहत होती.
"काहीं उरलेच नाही आता !!"समीर अगदी रागात म्हणाला.
    प्रेम आणि मी !! अस आईला म्हणनारा समीर सायलीच्या प्रेमात पडला होता. वरवर ते त्याला कळत न्हवते. पण त्याची वागणूक आता तेच सांगत होती. सायली  पुन्हा पुन्हा त्याला बोलतं होती. पण समीरच्या मनात काही वेगळच चाललं होत. सायली आणि तुषार यांच्यात खरंच काही आहे का ?? सचिन म्हणतोय ते खरं असेन का ?? की सचिन खोट बोलतोय.समीरला यातलं काहीच कळत न्हवत. पण त्याला मनातुन एवढं कळलं होत की सायलीवर त्याच मनापासून प्रेम होत. त्याला तो नाकारू शकत नाही हेही त्याला कळलं होती. थेट सायलीला विचारलं तर आणि अस काही नसेन तर तिचं मन दुखावले जाईन म्हणून सगळं काही समीर मनातच ठेवून होता. पण सचिनला विचारलं तर?? असा मनात विचार येताच समीर त्याला भेटायला निघाला . मनातल्या वादळास कुठेतरी निवारा शोधायला निघाला.

क्रमशः...

****************

सुर्यास्त ...!! (कथा भाग ३)

#Yks

  समीर घाईघाईत घरातून बाहेर पडला. त्याला कधी एकदा सचिनला भेटेन अस झाल होत. मनातल वादळ त्याला शांत राहू देत न्हवत. खरंच तुषार आणि सायली एकमेकांवर प्रेम करतात का ? मग ही गोष्ट मला सायलीने का सांगितली नाही. अश्या कित्येक विचारात समीर सचिनच्या घरी आला. तिथे पोहचताच त्याला तूषारही तिथेच भेटला. आता त्याला काय बोलावे हेच कळत न्हवते. तुषार समोर कसे बोलणार सायली बद्दल म्हणून तो गप्पच राहिला.
"काय समीर कस काय येणं केलंस सचिनकडे?" तुषार थोडा मिश्किल हसत म्हणाला.
"काही नाहीरे सहजच आलो होतो!!"
"सहजच!! बरं बरं ठीक आहे !! अरे सायली होती कारे घरी?" तुषार असा विचारेन अस समीरला कधी वाटलं ही न्हवत.
"काही पाहिलं नाहीरे !!" समीर बोलून गेला.
"अरे आज भेटणार होतो आम्ही !! तिकडेच चलो होतो म्हणून विचारलं की ती निघाली असेन तर मला जावं लागेल!!" तुषार या बोलण्याने समीरला काय बोलावे तेच कळेना. तो तिथून निघण्याचा प्रयत्न करू लागला.
"चल मी जातो आता!!"
"अरे समीर आलास काय आणि चालास काय थांब थोडा वेळ!!" सचिन समीरला म्हणू लागला.
"नको अरे!! मला काम आहेत!! जायचं होत बाहेर!! "
  सचिनला तुषार जे बोलला त्यावर विश्वासाचं होत न्हवता. सायली आजपर्यंत माझ्याशी का लपवत होती. की तुषार आणि ते भेटतात म्हणुन. कधी तिने याचा विषयही का काढला नसेन. सायली का वागली आसेन माझ्याशी अशी. कित्येक विचाराचा कल्लोळ समीरच्या मनात होता. ती सांज वेळ होती आणि समीर घरी येऊन गच्चीवर बसून सुर्यास्त पहात होता. कदाचित आजही त्याला फक्त त्याचीच साथ होती. वहीच्या पानावर तो लिहू लागला मनातलं सगळं काही मांडू लागला.

"नकळत या मनास का
वेड लागले कोणाचे
कधी भासे मझ ते आपले
कधी वाटे ते परक्याचे

कदाचित चुकली असेन
मनात समजूत नात्यांची
कधी आपले दुखावले
तर कधी हासू हे परक्याचे

साद घालत आपुल्यास तेव्हा
मी शोधले माझ्या मनास
कधी भेटला एकांत नी
कधी भेटला उपहास

नकळत या मनास का
वेड लागले कोणाचे!!!

सुर्य ही आज केव्हाच मावळला होता. समीर कित्येक वेळ तिथेच बसून होता. अंधार झाला तरी तो गच्चीवरच होता. तेवढ्यात समीरची आई तिथे आली कित्येक वेळ समीर आलाच नाही म्हणून त्याला पाहायला वर आली.
"समीर अरे अंधार झाला तरी आज तू गच्चीवर कसा थांबला?" आईच्या या बोलण्याने समीर अचानक भानावर आला. त्याच लक्ष कुठेतरी पार विचारत गडून गेलं होत.
"काही नाही आई असच आज बसावस वाटलं म्हणुन!!!"
"सुर्यास्त नंतर तुला ती संध्याकाळ उदास वाटते ना ?? तरीही तू वर आहेस ?? काय झाल समीर सांगशील??" आई समीरला मनापासून विचारू लागली.
"आई बघ ना!! काल परवा पर्यंत आपली वाटणारी माणसं क्षणात परकी वाटायला लागतात ना!!! समीर आता आईला मनातल बोलत होता.
"कोणा बद्दल म्हणतोय समीर ??"
"सहजच वाटलं अस म्हणुन!!कित्येक क्षण ते असे सहज विसरून जातात!! आपल्याला त्यांच्या बद्दल काही माहितच नाही अस वाटायला लागतं!!"
"समीर!! आयुष्यात माणसं खुप येतात, काही सतत सोबत असतात तर काही क्षणाचे सोबती असतात!! " आई समीरकडे पहात म्हणाली.
"पण आई समोरच्याला इतकं विसरता येत??"
"विसरायचं असेन तर विसरायचं !! शेवटी आयुष्य कसं जगावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे!! तुझ्या आयुष्यात अस कोणी आल तर याच वाईट ते का वाटावं!!
समीर आणि आई बोलत होते कित्येक मनातले किंतू समीर आईला विचारत होता त्यांचं हे बोलण चालू असतानाच. सायली घरी येताना दिसली. समीर तिला पाहून थोडा गोंधळला पण काहीच न बोलता तो गच्चीवरून खाली आला.
"काकु , तुमच्याकडे काम होत!!" सायली समीरच्या आईकडे पाहत म्हणाली.
"हो आलेच!! "
समीर सायली कडे न पाहताच बाहेर निघून गेला. सायलीला हे लक्षात आल पण ती काहीच बोलली नाही.
"काकु समीर असा का निघून गेला??"
""तुला बोलला नाही तो??" आई सायलीला विचारत होती.
"नाही!! बरं काकु उद्या आईने तुम्हाला बोलावलंय आणि समीरला पण सांगा ये म्हणुन! उद्या माझा वाढदिवस आहे ना म्हणुन!!"
"अरे वा !! नक्की येऊ आम्ही!! "
"बरं !! येते मी काकु!!"
सायली निघुन गेली. समीर आपल्याशी का बोलला नाही याचा विचार करत ती घरी गेली. उद्या माझा वाढदिवस आणि समीर आला नाहीतर कस होईन. तुषार आणि सचिनही येतीन वाढदिवसाला. पण समीर असा वागला का माझ्याशी!! मला त्याला काहीतरी बोलायचं होत पण ते राहूनच गेलं. जाऊदे उद्या येऊन तेव्हा बोलेन मी नक्की.. पण आलाच नाहीतर ..??  अश्या कित्येक विचारत सायली होती.
पण उद्या आला की असा का वागतोय ते मी विचारणार आहे मी त्याला ...!!

क्रमशः

**********************

सुर्यास्त ...!! (कथा भाग ४)

#Yks

माझ्या मनाचा थोडाही विचार का केला नाही समीरने, तो असा का निघून गेला. अशा विचारात सायली रात्रभर जागीच राहिली. सकाळच्या वेळी सर्वांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण तिला प्रतीक्षा होती ती समीरच्या शुभेच्छाची . संध्याकाळी सायलीच्या घरी सगळे जमले.
"काकु समीर??" सायली उस्कुतेने विचारू लागली.
"तो नाही आला, त्याला बर वाटत नाही म्हणाला!! " आई सायलीकडे पहात म्हणाली.
"सायली घरातून बाहेर पहात गच्चीवर पाहू लागली. समीर गच्चीवर बसलेला दिसला. पण तो आला नाही. तुषार , सचिन सगळे आले. सायलीची आई तिला बोलावू लागली. सगळे मिळून तिचा वाढदिवस साजरा करू लागले. पण सायलीच मन काही त्यात लागतं न्हवत. तिच मन समीर का आला नाही यातच गुंतून राहील होत.
"सायली ,समीर नाही आला ते ??" सचिन सायलीला विचारू लागला.
"अरे त्याला बर वाटत नाही म्हणे!! "
"सायली तुझा वाढदिवस आणि समीर नाही आला?? अस कस वागू शकतो तो?? " सचिन तिच्याकडे पाहत ! म्हणाला.
" जाऊ दे अरे !! त्याला बर वाटत नाही म्हणून आला नाही तो!! बाकी काही नाही!!" सायली सावरासावर करत म्हणाली.
"काही नाहीं !! तो असाच आहे बघ!! कालच मला म्हणत होता , सायलीच्या वाढदिवसाला मला यायचं नाही म्हणून!! "
"पण का असे !!" सायली अगदी मनातुन विचारू लागली.
"त्याला तुला बोलायचं नाही, म्हणत होता की सायली चांगली मुलगी नाही म्हणून!!  मला तिच्याशी कोणतही नात ठेवायचं नाही !! " सचिन एका वेगळ्याच उद्देशाने बोलू लागला.
"काय असा म्हणाला समीर ??" सायलीला सचिनच्या या बोलण्याने धक्काच बसला.
"हो!! तो म्हणे सायली माझ्या उगाच मागे मागे असते !! तिला काही कळतं नाही!! " सचिन खोट्या शब्दाची एक रेष सायलीच्या मनात ओढू लागला.
"अस असेन तर मीही नाही बोलणार त्याला, मी वाईट आहे ??  तो बोललाच कस अस.
"जाऊ दे सायली आता हा विषय इथेच संपव!! आणि समीरशी बोलूच नकोस!!त्याचे विचार तुझ्याबद्दल चांगले नाहीत !! " सचिन अगदी मनातली आग ओकत बोलू लागला.
  सायली मनातुन पूर्ण उध्वस्त झाली. ज्या समीरला आपण एवढं मनापासून आपलं समजल तो माझ्या बद्दल असे बोलावा याचा तिला विश्वासाचं बसेना. ती कित्येक वेळ कोणाशी काहीच बोलली नाही. सगळे आलेले मित्र, समीरची आई सगळे निघून गेले. सायलीला तेही लक्षात आले नाही. एकांतात बसून ती कित्येक वेळ आसवे गाळत होती. इकडे गच्चीवर सचिन आपल्या वहीत सायलीला शब्दांमधे लिहीत होता तिच्या असण्याला आपल्या शब्दात सांगत होता. त्या वहीची कागदे ते सगळं जड मनाने टिपून घेत होते..

"तुझ्या असण्याची जाणीव मला
ही हळुवार झुळूक का द्यावी
तू दूर त्या किनारी तरी
माझ्या जवळ का भासावी

हे फितूर झाले वारे मजला
कोणती ही आठवण यावी
तुझ्या सुंदर पानांच्या वहीत
एक ओळ माझी दिसावी

नसेल आज तुझ्या जवळ मी
कोणती ही सल मनात असावी
तुझ्या पासून दुर राहुन मी
स्वतःस आज का शिक्षा द्यावी

सांग वाऱ्यास या सारे काही
खोटी सारी गोष्ट असावी
तू दूर त्या किनारी तरी
माझ्या जवळ का भासावी!!! 

समीर सारे काही मनातल त्या वहीत लिहिताना कित्येक वेळ तिथेच बसून होता. गच्चीवरून खाली येताच आईने त्याला सायलीकडे का आला नाहीस म्हणून विचारले असता त्याने काहीच न बोलता घरातून बाहेर निघून गेला. बाहेर जाताना सायली त्याला समोरच दिसली. पण यावेळी सायली समीरकडे पाहूनही न पाहिल्या सारखे करून निघून गेली. समीरला याच थोड नवल वाटलं पण त्याने याचा विचारही केला नाही.
आज कित्येक वर्षे मनातल सगळं सांगणारे ते दोघं एकमेकांना अनोळखी झाले होते. समीर बाहेर जाताना त्याला तुषार वाटेवरच भेटला.
"काय रे समीर!! आला नाहीस सायलीच्या वाढदिवसाला? " तूषारचा ओठांवर वेगळेच हास्य होते.
"नाही अरे !! बरं वाटतं न्हवत म्हणून नाही आलो!! " समीर तुटक बोलत होता. त्याला तूषारला बोलावं वाटत न्हवत.
"अरे सायली तर म्हणाली की तुला तिने सांगितलच नाही म्हणून!! "
"जाऊदे अरे !! जातो मी!!" समीर तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत होता.
"अरे थांब रे!! काय भांडलास की काय सायलीशी!! मला म्हटली ही होती की फार भांडतोस म्हणून तिला!! भेटते मला ती तेव्हा सांगत होती!! "
"मला याविषयी काही बोलायचं नाही !! तुषार मी जातोय.
समीर तिथून निघून गेला त्याला हे सारं नकोस झाल होत. समज गैरसमज आणि नात्यांच्या डावपेचात समीर आणि सायली हे नात कोमेजून जात होत.

क्रमशः

*********************

सुर्यास्त ...!! (कथा भाग ५)

#Yks

समीर आता कोणाशीच जास्त बोलत न्हवता. सायली आणि त्याच्यामध्ये आता बोलण पूर्ण बंद झाल होत. पण ते नात जे कोमेजून गेलं होत त्याला आता कुठेतरी विसरायचं होत. सायली पण आता समीरकडे जास्त येतं जात न्हवती. इतकं सुंदर नात गैरसमजातून उध्वस्त झाल होत. समीर आता दुसऱ्या गावाला जाण्यासाठी  विचार करत होता. कदाचित समोर असलेल्या सायलीला विसरायचं होत.म्हणूनच इथून त्याला बाहेर जायचं होत.
"आई!! मला तुझ्याशी बोलायचं होत थोडं!!" समीर अचानक आईला बोलत म्हणाला.
"बोल ना समीर!! काय झालं!!"
"आई मी परगावी जाण्याचा विचार करतोय नोकरीसाठी!! एका ठिकाणी मला चांगली संधीही चालून आली आहे !!"
"समीर !! अरे तू हे काय म्हणतोय !! परगावी !! या आईला सोडून जावं वाटेनं का रे तुला??" आई डोळ्यात अश्रू पुसत म्हणाली.
  आई अशी म्हणताचं समीरला अश्रू अनावर झाले.
"नाही आई !! पण संधी चांगली आहे !! आणि तूही ये ना तिकडेच नंतर !!! " समीर स्वतःला सावरत म्हणाला.
" अरे !!पण जावच लागेल का??"
"हो आई!! संधी चांगली आहे !!! "
"तुझ चांगलं होणार असेन तर मी नाही अडवणार तुला जा तू!!!" समीरची आई मनाला सावरत म्हणत होती. तिला त्याला अडवायच न्हवत. पण त्याचा विरह सहन करण्याची ताकद तिच्यात न्हवती.
कित्येक वेळ आई आणि समीर बोलत होते. सायली अचानक घरात येताना समीरला दिसताच तसेच समीर बाहेर निघून जाऊ लागला.
"काकु!! " समीर ची आई आतून बाहेर येत होती. समीर न बोलताच बाहेर निघून गेला होता.
"काय सायली !! "
"काकु काम होते तुमच्याकडे!!" सायली समीरच्या आईला अश्रू पुसताना पहात म्हणाली.
"काकु तुमचा चेहरा आज थोडा उदास का वाटतोय !! काहीं झाल का ??" सायली ने समीरच्या आईचे भाव बरोबर टिपले होते.
"काही नाही सायली !! मुलगा आपल्या पासून दूर जातोय म्हटलं की आईला त्रास होतोच !! "
"म्हणजे काय काकु!!"
"समीर परगावी जातोय !! नोकरीसाठी!! " समीरची आई असे म्हणताच सायलीला काय बोलावे तेच कळेना.
"पण अचानक कसकाय??"
"चांगली संधी आहे म्हणाला!! मला ही त्याला अडवाव वाटलं नाही !! शेवटी मीही एक आईच ना , मुलाच्या विरहाच्या विचारानेच डोळ्यात अश्रू आले!! पण त्याच चांगलं होत असेन तर मी कशाला अडवू!!" समीरची आई डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली. सायली कित्येक वेळ भानावरच न्हवती.
"तुझ काही काम होत म्हणालीस!!!" समीरची आई सायलीला विचारत होती.
"हो काकु !! पण विसरले मी काय काम होत ते!! मी नंतर येते !!!" अस म्हणत सायली तिथून बाहेर पडली.
सायली कित्येक वेळ घराच्या बाहेरच समीरच्या विचारात आणि तो येण्याची वाट पहात थांबली. असा कसा  कसा जाऊ शकतो समीर. त्याला एकदाही हा निर्णय मला सांगावा अस वाटल नाही. का वागत असेन तो असा माझ्याशी? पण मला तरी त्रास का व्हावा त्याच्या जाण्याचा. मी इथे का थांबली आहे त्याची वाट पाहत. का?? मी प्रेम तर नाहीना करत त्याच्यावर.!! नाही नाही!! मी वाईट आहे समीरच्या नजरेत मी वाईट आहे. मी नाही बोलणार त्याला. तो माझ्यामुळेच चालला आहे दुर!! असा कसा वागू शकतो तो!! पण मी का म्हणून बोलू त्याच्याशी!! कित्येक वेळा मी समोर आले त्याच्या तरीही तो मला बोला नाही.  वाढदिवसाला ही आला नाही. नाही नको !! मी बोलले तर परत म्हणेन की मी मागे मागे असते म्हणून!! नाही नकोच !! हो मी मान्य करते की मी करते प्रेम त्याच्यावर !! पण मीच का बोलायचं!! नाही मी नाही बोलणार!! तो जाणार असेन तर जाऊदे !! त्याच्या नसण्याचे दुःख मी सहन करेन पण मी नाही बोलणार त्याला !! समीर एवढं छान नात आपल अस का रे तुटलं सांग तरी!! मी नाही बोलले तरी तू बोल !! माझ्या मनात फक्त तूच आहेस!! पण मला वाईट समजून तू माझ्याशी अस नकोस वागू रे !! मी नाहीये वाईट!!
  असंख्य विचारांचा कल्लोळ चालू होता सायली फक्त विचार करत होती. समीर पुन्हा तिच्या समोर यावा आणि तिला बोलावा एवढंच तिला हवं होत. मनातल सार काही बोलायचं होत. पण मीच का ?? हेच फक्त अडवत होत. सायली विचार करत असताना समीर तिच्या अचानक समोरून जाताना तिला दिसला. त्यानं पाहिलं तिच्याकडे पण तो बोलला नाही. सायली फक्त बघतच राहिली.
समीर घरात निघूनही गेला. सायली तिथेच उभी होती. तिला वाटलं होत समीर तिला सांगेन की तो चाललाय पण तो बोललाच नाही. घरी समीर गेला आणि सायली बद्दल मनात असंख्य विचारांमध्ये दंग होऊन गेला. कशासाठी सांगू मी तिला, की मी आता कायमचा निघून जातोय इथून!! त्याचा काही फरक पडणार नाहीये आता !! ती पाठमोरी जातानाच जेव्हा तिच्यासाठी कविता लिहिली तेव्हाच ती माझ्या मनात घर करून राहिली होती!! प्रत्येक क्षण एकमेकांना सांगणारे आम्ही , पण ती काहीच सांगत न्हवती!!  मग मी का सांगू की मी आता इथून निघून जातोय!! आणि असही मी गेलो तरी काय फरक पडणार आहे तिला !! तुषार आहेच ना तिच्या आयुष्यात!! नाही मी नाही सांगणार तिला की मी आता इथे राहणार नाही ते !! मला तिला विसराव लागेन !!आणि ती अशीच समोर राहिली माझ्या तर मी कधीच नाही विसरू शकणार तिला !! तिच्यावर माझ प्रेम कायम असेन पण तिच्या आयुष्यात आता मी कुठेच नसेन..!! माझ्या किवितेतून फक्त तिलाच शब्द बोलतील !! पण ते तिला कधीच कळणार नाहीत !!  नाही मला तिला आता विसरावंच लागेन !!!!
समीर असंख्य विचारत हरवुन गेला होता. त्याला सायलीला विसरायचं होत...!!

क्रमशः

*********************
सुर्यास्त...!!  ( अंतिम भाग)

#Yks

    सतत सोबत हवी वाटणारी व्यक्ती आता नकोशी का वाटावी. कदाचित नात आता उरलेच न्हवते. उरल्या होत्या फक्त समज गैरसमज याच्या वाईट आठवणीं. मी कदाचित चुकलो असेन पण माझं प्रेम आजही तसच आहे. कदाचित समीर आणि सायलीच मन हेच बोलत असेल. समीर आता जाण्यासाठी तयार झाला होता. सायलीला त्याने जाऊ नये असच वाटत होत. कित्येक दिवस एकमेकांना एका शब्दानेही ते बोलले न्हवते.
"समीर , तुझ्याशी बोलायचं आहे थोड!!" समीरची आई समीरकडे पहात म्हणाली.
"काय आई !! बोलणं!!! "
"कित्येक दिवस झाले मी एक गोष्ट पाहतेय !! तू सायालीशी काहीच बोलत नाहीस , ती आली की निघून जातोस !!  भांडणं झाल का तुमचं ??" आईच्या या अनपेक्षित प्रश्नाने समीर गोंधळून गेला.
"नाही आई , काहीच नाही झाल !! "
"मग मध्ये तिच्या वाढदिवसाला पण नाहीस आला!!काय झालंय का मला सांग !! "
"आई ,कित्येक गोष्टी मला नाहीत पटत, माझ्या प्रत्येक गोष्टीत मी तिला जवळ केलं पण ती मलां काहीच सांगत नाही!! "
"समीर नात्यांमध्ये कोणी काही सांगावं याच बंधन नसतं !! तुझ्या वहीतली एकही कविता तू जिच्यासाठी लिहिली तिला सांगितली नाहीस!!पण तिच्या नजरेत तुला आपल करण्याची ओढ कधी दिसलीच नाही!! समीर मी आई आहे तुझी !! त्या दिवशी सायली समोरून गेल्यावर तू कविता म्हणाला होतास तेव्हाच मी तुझ्या नजरेत तिच्याबद्दल प्रेम वाचलं होत!!" समीरची आई समीरला सगळं काही मनातल सांगत होती.
"तू तिला बोलला नाहीस !! पण तुलां ती तिच्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या दिवशी बोलवायला आली !! "
"पण आई तिला मला बोलायचं नाही आता !! आणि मीही नाही बोलणार तिला !! " समीर आईकडे पाहत म्हणाला.
"तिला बोलायचं नाहीये हे तू कस ठरवलं!! सतत काही कारण काढून ती माझ्याकडे येते पण तिला तुला बोलायचं असतं!! आणि तू प्रत्येक वेळी निघून जातोस!!"
समीरला काय बोलावं तेच कळेना तुषार आणि सचिनचं ऐकून आपण मोठी चूक तर केली नाहीना असे त्याला वाटू लागले. तो कित्येक वेळ सायली चा विचार करू लागला. खरंच आपण चुकलो याची जाणीव त्याला झाली होती.  कारण आपण सायलीला बोलायला हवं होत, गैरसमजच, विचारांचं चक्र बंद करून टाकते आणि उरतो फक्त अंधार. समीर आता परगावी जाण्यास निघणार होता. या सर्व गोष्टींचा विचार करणं बंद करायचं आणि आपण नव्याने सुरुवात करायची अस त्याने ठरवलं होत.
  सगळी तयारी झाली होती. समीरची आई अश्रू अनावर होऊन समीरकडे पाहून रडत होती. ज्याच्याशिवय एक दिवस राहू शकत नाही तो समीर आता तिला सोडून परगावी चालला होता. आईचा आशीर्वाद घेऊन तो बाहेर पडला तसा ,सायली समोरच उभा होती.
"कायमचा निघून चाललास??" सायली अचानक बोलून गेली.
"का??"
"तिकडे नोकरीची संधी आली म्हणून!!" समीर तिच्या डोळ्यात पहात म्हणाला.
"माझ्यापासून दूर जायचं आहे म्हणुन सांग ना सरळ!! मी चांगली मुलगी नाहीये ना म्हणून ना ?? "
"अस का म्हणतेय सायली !!! तू चांगली मुलगी नाहीस अस मी कधी म्हणालो का ??"
"हो म्हणाला होतास ना !! की मी मागे असते तुझ्या सारखं !! मी वाईट आहे !! " सायली डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली.
"तुला वाईट म्हणणं शक्यच नाही!! "
कित्येक वेळ दोघं एकमेकांशी बोलत होते. सायली आणि समीर यांना आपल्या चुका कळून आल्या होत्या.
भांडले ही दोघे. समीर आता जाण्यास निघाला होता. पण सायली त्याला जाऊच देत न्हवती. गैरसमज किती वाईट असतो हे दोघांना कळून आले होते.
"मग !! जायचं परगावी अजुन !! मला सोडून !!! " सायली समीरकडे पाहून म्हणताचं.
"नाही जाणार आता !! "
"छान , आणि आधीच का नाही बोललास तू मला !! किती ते गैरसमज माझ्याबद्दल !! " आणि यापुढे कोणाचही ऐकायचं नाहीस कळलं!! "
"हो बाबा कळलं मला !! " समीर माफी मागत म्हणाला .
"चल संध्याकाळ झाली !! गच्चीवर जायचं नाही का आज ??" सायली मिश्किल हसत म्हणाली.
"तुझी सोबत हवी आज मला तिथे !! "
दोघेही कित्येक वेळ गच्चीवर बसून तो सुर्यास्त पहात होते. सायलीकडे पाहत समीर म्हणाला.

" "कधी वाटे उगाच का
ओढ मनास ती लागे
तुझ्या जाण्याने मझ का
कोणती हुरहूर ती लागे

नसेल तुलाही विरह नको हा
चंद्र ताऱ्यात सोबती तु आहे
कधी सोबती मज कोणी तर
कधी एकांती तुझी सोबत आहे!!

कधी वाटे उगाच का
ओढ मनास ती लागे!!"
"तूच लिहीस आहेस ना ?? " सायली समीरला विचारू लागली.
"हो !! "
"माझ्यासाठी?? "
"नाही !!! तो सुंदर सूर्यास्त होतो ना त्यासाठी!! " समीर मस्करित सायलीला म्हणाला.
  त्या सुंदर सूर्यास्ता मधे समीर आणि सायली कित्येक वेळ गच्चीवर बसून होते. गैरसमज याचा सूर्यास्त केव्हाच झाला होता . उरला होता फक्त सुंदर क्षणाचा सूर्यास्त .... !!!

*समाप्त*

-योगेश खजानदार

***********************************************

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...