खूप दिवस झाले लेखणी बंद झाली आणि आतल्या आत कुठेतरी विचार कोंडल्या सारखे झाले. रोजच्या आयुष्यात जगताना आपण पूर्वीचे कुठेतरी हरवून गेल्याची जाणीव मनाला झाली. या विचाराना कुठेतरी वाट द्यावी वाटू लागल आणि सहजच विचारांचा वेग वाढत गेला. पूर्वी कॉलेज लाइफ मध्ये कविता लिहाव्या वाटायच्या एखाद ओळ सुचली तरी पूर्ण कविता व्हायची पण आता रोजच जगताना ते शब्द कुठेतरी हरवून गेलेत अस वाटू लागल आणि पुन्हा जमेल तस जमेल तेव्हा लिहाव हा निर्धार आज केला.
खरतर खुप दिवस बंद असलेली गाडी चालू करताना जशी मेहनत घ्यावी लागते तशी लिखाण करतानाही माझी अवस्था झाली. विषयच सापडत नव्हता. आता पूर्वी सारखं प्रेमावर कविता लिहावी तर तेही अडगळीत कुठेतरी धुळ खात पडल होत आणि त्यावरची धूळ झटकली की पुन्हा नव्याने तिथेच यावं अशी अवस्था. पण मग लिखाण करावं तरी काय हा यक्ष प्रश्न होताच मग म्हटल विषय जाऊदे जे सुचेल ते लिहाव आणि हा विषय लिहायला घेतला जसे सुचेल तसे.
बर आता पूर्वी सारखं अगदी वाचनही होत नाही, अगदी नाही अस नाही पण जरा कमीच, पण त्या बदल्यात माणूस रूपी पुस्तक मात्र भरपूर वाचायला भेटतात आणि त्यातले कित्येक लाख मोलाचे अनुभव शिकवून जातात. काही आनंदी असतात तर काही अगदी स्मशानात बसल्या सारखे गंभीर असतात. कोणी बडबड करत राहतात (माझ्यासारखे) तर काही बोला म्हटल तरी हसून शांत राहणारी असतात अशावेळी माझ्या सारख्या एकांत प्रिय माणसाचा खूप गोंधळ होतो आणि व्यक्ती तितक्या प्रकृती हे मनात ठेवून पुढे जाण्याचा विचार होतो.
म्हणूनच की काय पुन्हा शून्यात पाहताना सार विश्व तिथे दिसायला लागत. म्हणताना ते शून्य म्हणजे काहीच नाही पण ते एका सोबत असेल तर ? दहा होत आणि तो एक म्हणजे मला मी वाटायला लागतो आणि पुन्हा सगळं आकाश आपल्या पुढ्यात आहे ही भावना येते आणि सगळं काही स्पष्ट दिसायला लागत .. अगदी पूर्वी सारखं ..
✍️योगेश
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply