मुख्य सामग्रीवर वगळा

वाढदिवस || तिथी की तारीख || Marathi lekh ||

दरवर्षी वाढदिवस येतो आणि कित्येक आठवणी देऊन जातो. त्याची सुरूवात नवे वर्ष सुरू झाले की आपल्या जन्म दिवशी कोणता वार येतो तिथून केली जाते आणि दरवर्षी हे नक्की होत. हल्ली तर लहान मुलांचे महिन्याचे सुद्धा वाढदिवस साजरे केले जातात. पण पूर्वी तस काहीच नसायच, जन्म दिलेल्या आईलाही आपलं मूल केव्हा जन्मल हे नीटसं आठवत नसायचं. अगदी लांब कशाला माझ्या आईच तसच काहीस आहे. तिला तिची जन्म तारीख नक्की कधी आहे हेच माहित नाही. आज्जीला विचारलं की आज्जी एवढंच सांगायची की मोठी एकादशी झाली की दुसऱ्या दिवशी द्वादशीला तुझ्या आईचा जन्म झाला, १९६७ की ६८ ते नीटसं सांगता येत नाही, पण त्यादिवशी मंगळवार होता. बस्स एवढंच ते काय माहिती आईच्या वाढदिवसाबद्दल. मग काय गेली कित्येक वर्ष आईचा वाढदिवस आम्ही द्वादशीला साजरा करू लागलो. पण नक्की तारीख ती काय जाणुन घ्यायची इच्छा मला काही शांत बसू देईना.




या इंटरनेटच्या जगात काहीही भेटत हे मी चांगलच जाणून होतो. मग सुरू केला शोध आईच्या वाढदिवसाच्या तारखेचा. मंगळवार आणि द्वादशी एवढंच ते काय माहित होत. कित्येक वेबसाइट्स शोधल्या, जुने पंचांग पाहीले आणि अखेर ती तारीख मला मिळालीच, १८ जुलै १९६७ वार मंगळवार आणि द्वादशी हे सगळं या तारखेत आज्जीने सांगितलं तस जुळून आल आणि आईचा वाढदिवस त्यानंतर १८ जुलैला साजरा होऊ लागला. 

वाढदिवस आणि ती नेमकी तारीख हा घोळ पूर्वीच्या बऱ्याच लोकांमधे सहज पाहायला मिळतो, काहीचा वाढदिवस शाळेतल्या गुरुजींच्या कृपेने १ जूनला साजरा केला जातो आणि त्याबद्दल विचारलं तर हे लोक सहज म्हणतात, माझ्या आई बापाला कुठे आठवत होती तारीख  शाळेत घेऊन गेले, आणि मास्तरांनी लिहिली १ जून आणि तीच आमची ऑफिसियल जन्मतारीख झाली. 

म्हणूनच की काय पूर्वीचे लोक तिथीनुसार जन्मदिवस साजरे करत असत कारण त्यावेळी या इंग्रजी कॅलेंडरचे एवढे चोचले लोकांना माहित नव्हते. पण आता काळ बदलत गेला, ग्रेगोरियन कॅलेंडर हे आता जणू साऱ्या जगाचं कॅलेंडर झाल. म्हणूनच की काय मीही आईच्या वाढदिवसाच्या जन्मतारखेचा घोळ या इंटरनेटच्या सहाय्याने सहज सोडवला.

आता जणू वाढदिवस म्हणजे एक भव्यदिव्य सोहळाच होऊन बसला. राजकीय लोकांना तर यातून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचे एक कारणच मिळाले. केक, गिफ्टस , ग्रीटिंग कार्ड्स या साऱ्या गोष्टी यामागे जणू हळूच येऊन बसल्या. ती वाढदिवसाची तारीख म्हणजे तो दिवस त्या व्यक्तीसाठी एक पर्वणीच झाली. 

पण मला अजूनही नवल वाटत ते जुन्या लोकांचं त्यांनी कधी या गोष्टींना एवढी किंमत का दिली नाही याची.  जणू त्यांना मूल जन्मल्याच काहीच वाटत नव्हतं असच वाटतं असावं. पण हाही भ्रम माझा दरवर्षी मोडतो. माझी आज्जी न चुकता आजही आईला द्वादशीला आवर्जून फोन करते. तिला वाढदिवसाची शुभेच्छा देते. मग हा तारखेचा विषय कशासाठी तर बदलत जाणाऱ्या काळासाठी. कदाचित काही वर्षांनी अजून दुसरे काही येईल, पण बदलणार नाही ती वेळ. 

पण आता या तारखेच्या गोंधळातून वर येत विचार करावासा वाटतो तो आपण वाढदिवसाच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तींसोबत घालवलेला वेळ, सर्वात जास्त महत्त्वाचं खरतर ते आहे, आज पद्धत बदलली पण आपल्या माणसांची सोबत तीच आहे यात आनंद आहे. खरतर येत्या काळात अजून खूप काही बदलत जाईल. त्यादृष्टीने आपल्याला सुद्धा बदलत जायला हवं असं आता वाटत, पण बदलायच म्हणजे जुनं विसरायचं अस आहे का?? तर अजिबात नाही. आजही तारखेनुसार वाढदिवस साजरे झाले तरी तिथीनुसार येणाऱ्या वाढदिवसाला आवर्जून एक फुल तरी नक्की दिलं जात. एक जुन्या त्या क्षणांची आठवण म्हणून. 

शेवटी काय असतं तर वाढदिवस साजरा करणं महत्त्वाचं नसतं तर ती व्यक्ती आपल्या सोबत आहे. तिचा सहवास आपल्या सोबत आहे, आणि त्या क्षणांचा आनंद घेणं महत्त्वाचं असत. शेवटी वाढदिवस केवळ निमित्तमात्र. 


✍️योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...