मुख्य सामग्रीवर वगळा

सुनंदा ..!!( कथा भाग -२)

"पण आई त्या दुसऱ्या जगात आहे तरी काय अस?? " श्याम सूनंदाचा हात हातात घेत म्हणाला.
सुनंदा कित्येक वेळ फक्त श्यामकडे पहातच राहिली. तिला काय बोलावे तेच कळेना. काय आहे तिथे ?? खरंच मलाही कधी कधी हा प्रश्न पडतो,पण सुनंदा काहीच बोलली नाही, श्याम शाळेत जायला निघाला. सगळं आवरून तो चालत चालत शाळेच्या जवळही आला.
"काय श्याम रातीला कोण होत घरी ??" गावाची टवाळ पोर श्यामकडे बघून जोरात हसू लागली. पण श्याम सात वर्षाच पोर ते त्याला काहीच कळलं नाही. तो न बोलता पुढे निघून गेला. त्याच्या वर्गातली पोर मैदानावर खेळतं होती. ते पाहून श्यामही त्याच्या सोबत खेळायच म्हणून गेला.
"मी पण खेळू !!! " श्याम मित्राला विचारत म्हणाला.
"नको रे बाबा !! तुझ्या सोबत खेळताना बघितल तर बाप मारल मला !! " वर्गातला एक मुलगा श्यामला म्हणाला.
"का पण !!!"
"तू म्हण रांडेचा पोरगा आहेस म्हणून !!!"
"म्हणजे काय ???" श्यामला काहीच कळलं नाही.
"मला पण नाही माहिती!! पण बाप म्हणत होता मला!!"  जा बाबा इथून तू  आता!!" तो वर्गमित्र त्याला अगदी हाकलून दिल्या सारखं बोलला.
  श्याम कित्येक वेळ एकटाच बसून त्या मैदानावर त्याचाकडे पहात बसला. नक्की आपलं काहीतरी चुकतंय याच त्याला राहून राहून वाटत होत. पण काय ? रांडेचं पोर म्हणजे तरी नक्की काय. माझी आई माझ्यावर किती प्रेम करते. तिचा मी मुलगा आहे याच तर मला कौतुक वाटतं ना. खरंच ही दुसरी दुनिया वाईट आहे ना खूप!!! श्याम कित्येक विचाराणं मधे बुडाला. दिवसभर त्याच लक्ष शाळेत कुठे लागलच नाही. शाळेची वेळ बघता बघता निघूनही गेली. श्याम घरी जायल निघाला. घरी पोहचताच त्याने आईला विचारलं.
"आई , मला तुला काही विचारायचं आहे ??"
"काय रे श्याम , आताच तर शाळेतून आलास जा जरा हात पाय धुऊन ये!! " श्याम बाथरूम मधे जाऊन हात पाय धुऊन आला. पण त्याने पुन्हा विचारलं.
"आई , विचारू का ??"
"बरं , विचार श्याम !! "
"आई , रांडेच पोर म्हणजे काय ग ??"  श्याम ने अस विचारताच सुनंदला काय बोलावं तेच कळेना.
"श्याम , काय बोलतोय तू हे !! जा जाऊन अभ्यास कर."
"सांग ना आई , मला शाळेत सगळे रांडेचं पोर का म्हणत असतात?"
"श्याम, कोणी काहीही म्हटलं तरी आपण त्याकडे लक्ष नाही द्यायचं !! "अस म्हणून सुनंदा घरात निघून गेली.
  सुनंदा कित्येक वेळ डोळ्यातील टिपूस गाळत घरातच बसून होती. मनात असंख्य विचार करत होती " हा समाज मला नाव ठेवतो. पण याच समाजाने मला इथे आणून ठेवलं हे कोण का सांगत नाही. थोड्याशा पैशासाठी मला विकणारा माझा बाप पुन्हा गिऱ्हाईक म्हणून आला तर नवल काय वाटून घेऊ मी. आज माझा मुलगा शिकून मोठा व्हावा अस मला वाटत तर यात माझं काय चुकलं? का माझ्या मुलानेही इथेच चोऱ्या माऱ्या करून आयुष्य तुरुंगात घालायचं! मला वेश्या करणारा हा समाज पहिले स्वतःचा आंधळ्या वासना का पहात नाही. मला सुधारायचा म्हटलं तरी हा समाज मला जवळ करत नाही. प्रत्येक वेळी जिथे जावं तिथे वासनेने अंध झालेली कुत्री फिरत असतात. मग मी लाज का बाळगावी. दहावीत उत्तम गुण मिळाल्यावर मी नाचत घरी आले होते, तेव्हा माझ्या बापाने माझा हिशोब केला होता घरी. ओढत घेऊन जाताना कुठे गेला होता हा समाज. ?? "
"सुनंदे !!! " वस्तीतली आजी सुनंदाला हाक मारत घरात येत होती. सुनंदा डोळे पुसत स्वतःला सभाळून घेत होती.
"काय झाल ग !! रडतेस का ??" आजी सुनंदाची विचारपूस करू लागली.
"काही नाही!! नेहमीच दुसर काय !!! "
"कोण काय म्हणालं!!" आजी सुनंदाकडे पाहत म्हणाली.
"श्यामला आज कोणीतरी शाळेत रांडेचा म्हणाला !! तर श्याम अर्थ विचारत होता मला!! "
"बाई ग !! एवढं मनाला नाही लावून घ्यायचं!! हे का नवीन आहे आपल्याला!! तू बाकी मनानं खूप हळवी आहेस बघ !! सुनंदा या जगात आणि त्या जगात खूप अंतर आहे बघ !! एकदा का इकडे आल की सुटका नाही!! आणि ते जग काय म्हणत याचीही परवा करायची नाही!!" आजी अगदी मनातल बोलू लागली.
"मलाही खूप मोह होता ग !! या दुनियेतील आपला प्रवास संपवून त्या दुनियेत जाण्याचा!! पण सारी गिधाड टपून बसतात आपला फडशा पाडायला. "आजी सुनंदा कडे सगळं काही बोलू लागली.
"म्हणून , हे असलं जीवन जगायचं???" सुनंदा भरल्या आवाजाने म्हणाली.
"हे आपलं जीवन आहे पोरी!! आपलं काम फक्त वासना पूर्ण करण्यासाठी !! पण आपण माणुसही आहोत हे मान्य कोणी करणार नाही. आपाल्या मनात असंख्य भावना आहेत हे कोणी मान्य करणार नाही. आपण फक्त याच्या उपभोगाची वस्तू !! आजी पदराने डोळे पुसत म्हणाली.
"ये सुनंदा!!! दार उघडं !!! " बाहेरून कोणी इसम मोठ्याने ओरडून बोलू लागला.
"कोण आहे !!! " सुनंदा दरवाजा उघडत म्हणाली.
"सरपंच तुम्ही !!! आणि यावेळी ?? "
"आता काय तुला विचारून येत जाऊ का मी ??"  सरपंच दारूच्या नशेत सुनंदा वर खेकसला.
" नाही , तसं नाही !! पण लवकर आलात म्हणून विचारलं!!! "
"बरं चल!! बसं कर बोलणं !! ये म्हातारे निघ चल आता !!! मला निवांत पडायचं आहे इथे!! " सरपंचाच्या  या बोलण्याने आजी बाहेर निघून गेली.
"आई, दरवाजा का बंद केला ??" श्याम बाहेरून हाक मारत आईला बोलू लागला.

क्रमशः

✍ योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...